कोलंबो, 13 सप्टेंबर: रविवारी रात्री दुबईच्या मैदानात दसून शनाकाच्या श्रीलंकन संघानं कमाल केली. श्रीलंकेनं पाकिस्तानसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला नमवून आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. स्पर्धेच्या सुरुवातीला श्रीलंका चक्क आशिया चषक जिंकणार असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. इतकच नव्हे तर स्टार स्पोर्टसच्या एका पोलमध्ये श्रीलंकेची जिंकण्याची शक्यता 0 टक्के दाखवण्यात आली होती. पण इतक्या कमी लेखलेल्या संघानं सरतेशेवट अशी कामगिरी बजावली की अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आठ वर्षानंतर श्रीलंकेनं पुन्हा आशिया चषक जिंकला. श्रीलंकेचा हाच संघ आज मायदेशात दाखल झाला. तेव्हा लाखो चाहते विजयी संघाच्या स्वागतासाठी हजर होते. जल्लोषात स्वागत दुबईतून आज श्रीलंकन संघ कोलंबोत दाखल झाला. विमानतळावरुन एका ओपन बसमधून संपूर्ण संघाची जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांनी गर्दी केली होती. हातात आशिया चषक घेऊन कर्णधार शनाकानं चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
📸 A grand welcome for the victorious Sri Lanka Team! #AsianChampions
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 13, 2022
More Images: https://t.co/rXjBuTk3Q6#AsiaCup2022Final #RoaringForGlory pic.twitter.com/EPGnmOZxI5
हेही वाचा - हॉलिवूड अभिनेत्रीही तिच्यासमोर फिक्या, महिला क्रिकेटपटूला पाहून चाहते क्लीन बोल्ड! दिवाळखोरीत बुडालेलेल्या लंकेला नवी उमेद काही महिन्यांपासून श्रीलंकेतली परिस्थिती आणीबाणीची झाली आहे. इथे फार मोठं राजकीय स्थित्यंतर झालं. देशातलं वातावरण अस्थिर बनलं. इतकच नव्हे तर दोन महिन्यांपूर्वी नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. याचा श्रीलंकेन क्रिकेटलाही मोठा फटका बसला. खरं तर नुकतीच पार पडलेली आशिया कप स्पर्धा श्रीलंकेतच आयोजित करण्यात आली होती. पण या सगळ्या परिस्थितीमुळे अखेरच्या क्षणी एशियन क्रिकेट काऊन्सिलनं स्पर्धा यूएईत खेळवण्य़ाचा निर्णय घेतला. श्रीलंकेसाठी हा फार मोठा धक्का होता. पण अशा परिस्थितीतही श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला. पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारला. पण त्यानंतर जोरदार मुसंडी मारत श्रीलंकेनं इतिहास घडवला. श्रीलंकेच्या या विजयानं लंकन नागरिकांना एक नवी उमेद मिळाली आहे. महागाई आणि अस्थिर झालेल्या वातावरणात जगणाऱ्या श्रीलंकन नागरिकांच्या चेहऱ्यावर आशिया चषकातल्या या विजयानं हास्य फुलवलं. म्हणूनच दोन महिन्यांपूर्वी सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेले नागरिक आज या विजयी शिलेदारांच्या स्वागताला रस्त्यावर उतरले.