दुबई, 6 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) सुपर-12 स्टेज आता शेवटाकडे आली आहे, पण अजूनही सेमी फायनलच्या चार टीम ठरलेल्या नाहीत. आतापर्यंत फक्त पाकिस्तानचा (Pakistan) सेमी फायनलमध्ये प्रवेश झाला आहे, तर इंग्लंडची टीम सेमी फायनल खेळेल हे जवळपास निश्चित झालं आहे. सुपर-12 च्या दुसऱ्या ग्रुपमध्ये असलेल्या टीम इंडियासाठी (Team India) सेमी फायनलला पोहोचणं सध्या तरी धूसर दिसत आहे, कारण भारताचं भवितव्य रविवारी होणाऱ्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड (Afghanistan vs New Zealand) यांच्यातल्या सामन्यावर अवलंबून आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला आणि सोमवारी भारताने नामिबियाला हरवलं, तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचू शकते. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या मॅचबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे. ‘रविवारी अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला, तर चांगल्या नेट रनरेटमुळे टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकते. क्रिकेटसाठी ही गोष्ट चांगली असेल, पण असं झालं तर खूप प्रश्न उपस्थित केले जातील,’ अशी भीती शोएब अख्तरने व्यक्त केली आहे.
‘भारताचं भविष्य आता न्यूझीलंडच्या हातात आहे. न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला तर खूप प्रश्न उपस्थित केले जातील. मी आधीच तुम्हाला सावध करतोय. हा मुद्दा ट्रेंडिंगमध्ये येईल. मला कोणत्याही वादात पडायचं नाही. न्यूझीलंडची टीम अफगाणिस्तानपेक्षा चांगली आहे, पण ते चांगले खेळले नाहीत, तर त्यांचा पराभव होईल. यानंतर मात्र सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया उमटतील, त्याचाही विचार करावा लागेल,’ असं शोएब अख्तर म्हणाला. ‘टी-20 वर्ल्ड कप आता रोमांचक वळणावर आला आहे. भारत चमत्काराच्या जवळ आला आहे, पण हे सध्या तरी अशक्य दिसत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडवर मात्र दबाव नक्कीच असेल. हा सामना क्वार्टर फायनलचा मुकाबला होईल,’ असं वक्तव्य शोएब अख्तरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केलं.

)







