सिल्हेत-बांगलादेश, 1 ऑक्टोबर: वुमन्स आशिया कपमध्ये हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली. भारतानं श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना जिंकून या स्पर्धेत विजयी सलामी दिली. जेमिमा रॉड्रिग्सचं यशस्वी कमबॅक हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं जेमिमाच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतानं श्रीलंकेसमोर 151 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला सर्वबाद 109 धावांचीच मजल मारता आली आणि भारतानं हा सामना 41 धावांनी जिंकला. पण या सामन्यात अम्पायरच्या एका निर्णयाची जोरदार चर्चा झाली. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनही अम्पायरच्या त्या निर्णयानं आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. आऊट की नॉट आऊट? त्याचं झालं असं की भारतीय डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दोन रन्स धावून पूर्ण करताना पूजा वस्त्रकार रन आऊट झाली. पण श्रीलंकन संघानं रनआऊटसाठी अपील केलं तेव्हा ऑन फिल्ड अम्पायरनं थर्ड अम्पायरकडे निर्णय सोपवला. थर्ड अम्पायरनं जेव्हा रिव्ह्यू करुन पाहिलं तेव्हा स्क्रीनवर पूजा क्रीझमध्ये पोहोचल्याचं दिसत होतं. पण तरीही आपला निर्णय देताना थर्ड अम्पायरनं आऊट दिलं. या निर्णयामुळे मैदानातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. पण तरीही अम्पायरनं दिलेला निर्णय मानून पूजा मैदानाबाहेर गेली. युवराज सिंगचीही प्रतिक्रिया या रन आऊटच्या निर्णयावर टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगनंही ट्विट करत प्रतिक्रिया दिली. अशा वेळी थर्ड अम्पायला जरी जरी शंका असेल तर निर्णय देताना बॅट्समनच्या बाजूनं द्यायला हवा होता असं युवराजनं म्हटलं आहे.
That’ is such a poor decision by the third umpire ! Should have given pooja vastrakar benefit of doubt !! #indiavssrilanka #WomensAsiaCup
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 1, 2022
दुखापतीनंतर जेमिमाचं कमबॅक या रन आऊटचा भारतीय संघाच्या कामगिरीवर फारसा फरक पडला नाही. दरम्यान त्याआधी टीम इंडियाची आघाडीची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सची खेळी खास ठरली. जेमिमा रॉड्रिग्सला इंग्लंड दौऱ्याआधी मनगटाला दुखापत झाली होती. त्यामुळे इग्लंडविरुद्धच्या टी20 आणि वन डे मालिकेला मुकावं लागलं होतं. यादरम्यान महिनाभर जेमिमानं बॅटही हातात घेतली नव्हती. पण त्यानंतर तिनं आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात जोरदार कमबॅक करताना 76 धावांची खेळी साकारली. तिच्या या खेळीत 11 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. या सामन्यात सलामीची स्मृती मानधना (6) आणि शफाली वर्मा (10) ही जोडी स्वस्तात माघारी परतली. पण त्यानंतर जेमिमानं कॅप्टन हरमनप्रीतच्या साथीनं टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. हरमन 33 धावा काढून बाद झाली. हेही वाचा - Cricket: धक्कादायक… भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कॅप्टनला मोठी दुखापत, फोटो पाहून व्हाल हैराण
श्रीलंका 109 धावात ऑल आऊट
त्यानंतर भारताच्या स्पिन अटॅकसमोर श्रीलंकेचा डाव 18.2 ओव्हर्समध्ये 109 धावातच आटोपला. भारताकडून हेमलतानं 3 तर दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकारनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.