मुंबई, 26 जानेवारी : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजा पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी संघात असणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीनंतर त्याची सर्जरी झाली होती. यामुळे तो बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाच्या कसोटी मालिकेत खेळण्याआधी रविंद्र जडेजा सरावासाठी रणजी ट्रॉफीमध्ये खेळायला उतरला आहे.
सौराष्ट्रकडून खेळताना त्याने तामिळनाडुविरुद्ध जबरदस्त कामगिरी केलीय. रणजी ट्रॉफीत पहिल्या दोन दिवसात जडेजाला फलंदाजी आणि गोलंदाजीतही फारशी चमक दाखवता आली नव्हती. मात्र तिसऱ्या दिवशी जडेजाने अशी काही कामगिरी केली की तामिळनाडुच्या फलंदाजांची भंबेरी उडाली.
हेही वाचा : टीम इंडियाचे दुखापतीचे ग्रहण सुटेना, आणखी एक खेळाडू आगामी मालिकेतून बाहेर
तामिळनाडुने पहिल्या डावात 324 धावा केल्या होत्या. यात जडेजाला गोलंदाजी करताना फक्त एकच विकेट मिळवता आली होती. तर सौरष्ट्रच्या संघाने फलंदाजी करताना 192 धावा केल्या. जडेजाने फक्त 15 धावांचीच खेळी केली. त्यानतंर तामिळनाडु 132 धावांच्या आघाडीवर होते. सौरष्ट्रचा संघ अडचणीत असताना दुसऱ्या डावात जडेजा धावून आला. त्याच्या गोलंदाजीसमोर तामिळनाडुच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात शरणागती पत्करली.
जडेजाने दुसऱ्या डावात 53 धावा देत सात गडी बाद केले. यामुळे तामिळनाडुचा दुसरा डाव 133 डावात आटोपला. सौराष्ट्रकडून धर्मेंद्र सिंह जडेजाने इतर तीन गडी बाद केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सौराष्ट्रने 4 धावांवर 1 विकेट गमावली होती. अखेरच्या दिवशी सौरष्ट्रला विजयासाठी 262 धावा कराव्या लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Ravindra jadeja