नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : दोन दिवसापूर्वी, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) भारताचा (Team India)पराभव झाल्यानंतर भारतात काही ठिकाणी फटाके फोडण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे. भारतात राहणाऱ्या एका शिक्षीकेने पाकिस्तान (Pakistan)जिंकल्यानंतर व्हॉट्सअप स्टेट्स ठेवत आनंद व्यक्त केला. मात्र, तिला हा आनंद चांगलाच महागात पडला. राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिक्षिकेनं पाकिस्तानच्या विजयानंतर व्हॉट्स ऍप स्टेटस टाकत आनंद व्यक्त केला. या शिक्षिकेला खासगी शाळेनं नोकरीवरून कमी केलं आहे. T20 World Cup : IND vs Pak सामन्यानंतर भारतात फटाके फुटले, सेहवागचा खळबळजनक दावा
कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव नफीसा अटारी असं आहे. नफीसा या उदयपूरमधील नीरजा मोदी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पाकिस्तानकडून भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर नफीसा यांनी स्टेटसवर टीव्हीवर सामना पाहतानाच फोटो ठेवला होता. या फोटोला त्यांनी ‘जीत गये… वी वोन’ अशी कॅप्शन दिली होती. या फोटोमध्ये रिझवान आणि बाबर आझमचा फोटो दिसत आहे. त्यानंतर नफीसा यांनी ठेवलेल्या स्टेटसचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाला आणि ही शाळा चालवणाऱ्या ट्रस्टच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत नफीसा यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी शाळेने त्यांना नोकरीवरुन काढत असल्याचं पत्रक जारी केलं आहे. नीरजा मोदी स्कूलच्या शिक्षिका नफीसा अटारी यांना सोजतिया चॅरिटेबल ट्रस्टच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार नीरजा मोदी स्कूलमधून तात्काळ स्वरुपाने नोकरीवरुन काढून टाकण्यात येत आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे. या पत्रावर चेअरमनची स्वाक्षरी आहे.
टी-२० टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाला. त्यामुळे पाकिस्तानात सध्या आनंदाचं वातावरण आहे. मात्र भारतातही काही जणांना पाकिस्तानच्या विजयाचा आनंद झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण वीरेंद्र सेहवागनेदेखील ट्विट करत ‘दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यावर बंदी आहे, पण तरीही काल पाकिस्तानच्या विजयानंतर भारताच्या काही भागांमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. ते क्रिकेटच्या विजयां सेलिब्रेशन करत होते. मग दिवाळीमध्ये फटाके फोडले तर काय होतं? हा दांभिकपणा का? सगळं ज्ञान तेव्हाच का आठवतं?’ असा सवाल सेहवागने उपस्थित केला होता.