अहमदाबाद, 27 मे : आरसीबीच्या (RCB) शेवटच्या लीग स्टेज सामन्यात (IPL 2022) विराट कोहलीने (Virat Kohli) 73 रनची खेळी केली, तेव्हा तो पुन्हा फॉर्ममध्ये आला असं वाटत होतं, पण एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विराटची बॅट शांतच राहिली. विराटकडून चाहत्यांना या दोन सामन्यांमध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्यांची निराशा झाली. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात विराटची इनिंग फक्त 8 बॉल चालली, यात तो 7 रन करून आऊट झाला. पुन्हा एकदा प्रसिद्ध कृष्णानेच विराटला धक्का दिला.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर आरसीबीकडून विराट आणि फाफ डुप्लेसिस मैदानात उतरले. राजस्थानकडून ट्रेन्ट बोल्टने पहिली ओव्हर टाकली, या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला विराटने खणखणीत सिक्स मारला. विराटच्या या सिक्सनंतर चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या, पण पुढच्याच ओव्हरमध्ये यावर पाणी पडलं, कारण प्रसिद्ध कृष्णाने विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
जुनी कमजोरी विराटवर पडली भारी
प्रसिद्ध कृष्णाच्या दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल फाफ डुप्लेसिसने खेळला, यानंतर तिसऱ्या बॉलला कोहली स्ट्राईकवर आला. कृष्णाने 146.5 किमी प्रती तासाच्या वेगाने इन स्विंग टाकला, हा बॉल कोहलीने सोडला. यानंतरचा पुढचा बॉलही त्याने असाच टाकला तेव्हा विराटने डिफेन्सिव शॉट खेळला. पाचव्या बॉलवर प्रसिद्ध कृष्णाने विराटच्या जुन्या जखमेवर पुन्हा वार केला. ऑफ स्टम्प बाहेर असलेल्या या बॉलला थोडा बाऊन्स होता, पण विराट पॉईंटच्या दिशेने शॉट मारायला गेला, यात त्याच्या बॅटच्या एजला बॉल लागला आणि विकेट कीपर संजू सॅमसनने कॅच पकडला.
तिसऱ्यांदा केलं विराटला आऊट
या मोसमात प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्यांदा विराट कोहलीला आऊट केलं आहे. दोन्ही टीममध्ये झालेल्या मागच्या सामन्यातही कृष्णानेच विराटला माघारी पाठवलं. तेव्हा पूल शॉट मारण्याच्या नादात विराट कॅच आऊट झाला. मागच्या 7 इनिंगमध्ये कृष्णाने विराटला तिसऱ्यांदा आऊट केलं आहे. मागच्या वर्षी केकेआरकडून खेळतानाही कृष्णाला विराटची विकेट मिळाली होती.
आयपीएलच्या या मोसमात विराटने 16 मॅचमध्ये 22.73 च्या सरासरीने आणि 115.98 च्या स्ट्राईक रेटने 341 रन केले आहेत, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 73 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.
आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून विराट कोहली आरसीबीकडून खेळत आहे. आतापर्यंत त्याने आयपीएल नॉक आऊटचे 11 सामने खेळले आहेत, यात त्याला फक्त एकदाच अर्धशतक करता आलं आहे. आयपीएल 2011 च्या फर्स्ट क्वालिफायिंग फायनलमध्ये विराटने 70 रनची खेळी केली, पण याशिवाय त्याला नॉक आऊटसारख्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठा स्कोअर करता आलेला नाही. आयपीएल नॉक आऊटच्या 11 सामन्यांमध्ये विराटने फक्त 212 रन केले.
आयपीएल नॉकआऊटमधली विराटची कामगिरी
आयपीएल 2009 सेमी फायनल- नाबाद 24 रन
आयपीएल 2010 सेमी फायनल- 9 रन
आयपीएल 2011 फर्स्ट क्वालिफायिंग फायनल - नाबाद 70 रन
आयपीएल 2011 सेकंड क्वालिफायिंग फायनल- 8 रन
आयपीएल 2015 एलिमिनेटर- 12 रन
आयपीएल 2015 सेकंड क्वालिफायर- 12 रन
आयपीएल 2016 फर्स्ट क्वालिफायर- 0 रन
आयपीएल 2020 एलिमिनेटर- 6 रन
आयपीएल 2021 एलिमिनेटर- 39 रन
आयपीएल 2022 एलिमिनेटर- 25 रन
आयपीएल 2022 क्वालिफायर 2 - 7 रन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, RCB, Virat kohli