शारजाह, 7 ऑक्टोबर : लागोपाठ तिसरी आयपीएल ट्रॉफी (IPL 2021) जिंकण्याचं मुंबईचं (Mumbai Indians) स्वप्न भंगलं आहे. कारण कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा (KKR vs RR) 86 रननी दारूण पराभव झाला आहे. प्ले-ऑफमध्ये मुंबईचा प्रवेश होण्यासाठी या सामन्यात राजस्थानने कोलकात्याला हरवणं आणि मग शुक्रवारी मुंबईने हैदराबादचा (SRH) पराभव करणं गरजेचं होतं, पण राजस्थानने कोलकात्यासमोर गुडघे टेकल्यामुळे मुंबईच्या स्वप्नांना धक्का बसला. कोलकातल्याच्या या विजयामुळे फक्त मुंबईच नाही तर पंजाबचंही प्ले-ऑफला पोहोचता येणार नाही. कोलकात्याने दिलेल्या 172 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला फक्त 85 रनपर्यंतच मजल मारता आली. एवढ्या फरकाने विजय मिळवल्यामुळे कोलकात्याच्या नेट रनरेटला बूस्टर डोस मिळाला आणि मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचणं अशक्य झालं. या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण कोलकात्याने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 171 रन केले. ओपनर शुभमन गिलने 56 तर व्यंकटेश अय्यरने 38 रनची खेळी केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 79 रनची पार्टनरशीप झाली. राजस्थानकडून क्रिस मॉरिस, चेतन सकारिया, राहुल तेवतिया आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. प्ले-ऑफच्या चारही टीम ठरल्या या सामन्यासोबतच आयपीएल प्ले-ऑफच्या आता चारही टीम ठरल्या आहेत. दिल्ली, चेन्नई, आरसीबी आणि कोलकात्याच्या टीम प्ले-ऑफमध्ये दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई राहणार का आरसीबी याचा निर्णय शुक्रवारी होणाऱ्या मॅचनंतर होणार आहे. प्ले-ऑफमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या टीमना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोनवेळा संधी मिळते.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.