दुबई, 26 ऑक्टोबर : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि येथे कोणतेही अंदाज बांधणे धोक्याचे आहे, असे म्हटले जाते. यावेळी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला जेतेपदाची सर्वात मोठी दावेदार म्हटले जात होते. पण पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने टीम इंडिया समोर मोठे संकट उभे ठाकले आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. दरम्यान, आता अफगाणिस्तानच्या स्कॉटलंडविरुद्धच्या धडाकेबाज विजयाने ग्रुप 2 मध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे टीम इंडियाचे सेमीफायनलला पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण होउ शकेल का? यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021)अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने (Afghanistan Cricket Team) सुपर 12 च्या मॅचमध्ये स्कॉटलँडला पराभूत करत ग्रुप-2 मध्ये अव्वल स्थान मिळविले. अफगाण आर्मीने स्कॉटिश आर्मीचा 130 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पण, अफगाणिस्तानचा हा विजय टीम इंडियासाठी खोडा ठरत आहे.
सध्या ग्रुप 2 च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या खात्यात 2-2 गुण आहेत. मात्र स्कॉटलंडविरुद्ध 130 धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचा नेट रन रेट अधिक 6.500 आहे. तर पाकिस्तानचा नेट रन रेट प्लस 0.993 आहे.
पण पाकिस्तानकडून झालेल्या दारूण पराभवानंतर टीम इंडियाचा नेट रनरेट उणे 0.973आहे. न्यूझीलंडला अजून पहिला सामना खेळायचा आहे.
भारताला ग्रुप स्टेजमध्ये आणखी चार सामने खेळायचे आहेत. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धचा पुढील सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. पाकिस्तानपाठोपाठ भारतालाही न्यूझीलंडविरुद्ध हार पत्करावी लागली तर टी-20 विश्वचषकातून आव्हानच संपुष्टात येईल. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव झाल्यास, T20 विश्वचषक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला त्यांचे पुढील तीन सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध जिंकावे लागतील, तसेच इतर संघांच्या विजय आणि पराभवाच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला टॉप 2 मध्ये राहावे लागेल. समजा पाकिस्ताननंतर भारतालाही न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तर त्याच्याप्रमाणे पाकिस्तान किंवा न्यूझीलंड यापैकी एक मोठा संघ किमान दोन सामने हरला पाहिजे. असे असूनही, भारताला त्यांचे पुढील उर्वरित तीन सामने चांगल्या धावगतीने जिंकावे लागतील. अशा स्थितीत दोन सामने गमावूनही भारताला जीवदान मिळू शकते. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील मोठा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. तसेच अफगाणिस्तानच्याबाबतीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, T20 cricket, T20 league, T20 world cup, Team indian