सेंच्युरियन, 25 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातल्या 3 टेस्ट मॅचच्या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मॅचआधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) प्लेयिंग इलेव्हनबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत, पण टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी कठीण संवादाबाबत द्रविड बोलला आहे. टीममध्ये निवड झाली नाही आणि खेळाडू नाराज झाले तर ती चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे त्यांना टीममध्ये स्थान मिळवण्याचं महत्त्व माहिती आहे, असं द्रविड म्हणाला. भारताला अजून दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही.
राहुल द्रविडला इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या सीनियर खेळाडूंबाबत काय चर्चा झाली? असं विचारण्यात आलं. गेल्या काही काळापासून हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत, त्यामुळे दोघांनाही पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, यावर द्रविडने उत्तर दिलं. 'बहुतेक खेळाडू प्रोफेशनल आहेत, अनेकवेळा खेळाडूंसोबत कठीण संवाद करावा लागतो. तू खेळू शकत नाहीस, असं एखाद्या खेळाडूला सांगणं कठीण असतं, कारण प्रत्येकाला खेळायचं असतं,' असं वक्तव्य द्रविडने केलं.
प्लेयिंग इलेव्हनबाबतचा निर्णय भावनेवर नाही तर परिस्थितीनुसार घेतला जाईल, आमच्याकडे सर्वोत्तम खेळाडू उपलब्ध आहेत, पण 11 खेळाडूच खेळू शकतात, अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली. भारताला अजूनपर्यंत दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकता आलेली नाही.
कॅप्टन्सी वादावरही बोलला द्रविड
विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं होतं. या वादावर पहिल्यांदाच राहुल द्रविडने (Rahul Dravid) प्रतिक्रिया दिली आहे. 'दोन फॉरमॅटसाठी दोन कर्णधार ठेवण्याचा निर्णय निवड समितीचा होता. मी खेळाडूंसोबत काय चर्चा केली, त्याबद्दल मी सार्वजनिक बोलणार नाही,' असं राहुल द्रविड म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul dravid, Team india