जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) जोहान्सबर्गमध्ये सुरूवात झाली आहे. पण या मॅचआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का लागला. पाठीच्या दुखापतीमुळे विराट कोहली या टेस्टमध्ये खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी केएल राहुलला (KL Rahul) टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे, तर हनुमा विहारीला (Hanuma Vihari) टीममध्ये निवडण्यात आलं आहे. विराट या सामन्यात खेळू न शकल्यामुळे आता तो त्याचा खास मित्र आणि आरसीबीमधला (RCB) त्याचा सहकारी एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) पावलावर पाऊल ठेवणार आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत 98 टेस्ट खेळल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात तो मैदानात उतरला असता तरी ही त्याची 99 वी तशीच केप टाऊन टेस्ट 100 वी असती. पण आता या टेस्टमध्ये विराट खेळणार नसल्यामुळे केप टाऊनमध्ये होणारी टेस्ट त्याची 99वी असेल. 25 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणारी टेस्ट विराटसाठी 100 वी टेस्ट असेल. याआधी एबी डिव्हिलियर्सही त्याची 100 वी टेस्ट बँगलोरच्या मैदानातच खेळला होता.
विराट-एबीचं बँगलोरशी नातं
विराट आणि एबी डिव्हिलियर्स याचं बँगलोरशी असलेलं नातं सर्वश्रूत आहे. या दोघांनीही आरसीबीकडून खेळताना स्वत:चा वेगळाच फॅन बेस बनवला होता. आयपीएल 2021 नंतर एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर विराट कोहलीने आरसीबीची कॅप्टन्सीही सोडली.
आयपीएल 2021 चा दुसरा राऊंड युएईमध्ये झाल्यामुळे त्याला कॅप्टन्सीचा शेवट बँगलोरमध्ये करता आला नाही. आता आपली 100 वी ऐतिहासिक टेस्ट बँगोलरमध्ये खेळण्यासाठी विराटने जोहान्सबर्ग टेस्टमधून माघार घेतल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
एवढच नाही तर काहींनी 100 वी टेस्ट बँगलोरमध्ये खेळून विराट आता टेस्ट टीमची कॅप्टन्सीही बँगलोरमध्ये सोडेल, अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या आहेत. मॅचच्या 24 तास आधी विराट खेळेल, असं राहुल द्रविड सांगतो, तसंच मॅचच्या 17 तास आधी विराट बॅटिंग प्रॅक्टीसही करतो, मग त्याला अचानक दुखापत कशी झाली? असा सवालही काही जणांनी उपस्थित केला आहे.
विराट कोहली वादात
टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं होतं, यावरूनही भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद झाला होता. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सांगितलं. विराटने मात्र गांगुलीचा दावा फेटाळून लावला. आपल्याला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं कधीही सांगण्यात आलं नसल्याचं विराट म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india, Virat kohli