मुंबई, 27 जुलै : भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) दुसरी टी-20 मॅचवर कोरोनाचे संकट आले होते. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. पण, आता टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) याच्या संपर्कात आलेले 8 ही खेळाडूंची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मंगळवारी होणारी दुसरी टी-20 मॅच कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आली. मंगळवारी झालेल्या ऍन्टीजन टेस्टमध्ये कृणाल पॉझिटिव्ह आला, यानंतर आता सगळ्या भारतीय खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली. कृणाल पांड्याला कोरोना झाल्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टेस्ट टीमचंही टेन्शन वाढलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, आता 8 ही खेळाडूंची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
#BREAKINGNEWS All 8 Indian contingent members who were identified as close contacts of @krunalpandya24 have tested negative for #Covid_19 as per sources tracking developments in #COLOMBO#INDvSL @BCCI
— Kushan Sarkar (@kushansarkar) July 27, 2021
दरम्यान, कृणाल पांड्या 8 खेळाडूंच्या संपर्कात आला, यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांचा समावेश होता. पण, आता त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना दुखापत झाल्यामुळे हे दोघं श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडला रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला आधीच कोरोनाने धक्का दिला होता. विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि थ्रोडाऊन स्पेशलिस्ट दयानंद गरानी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. याशिवाय ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha), अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Ishwaran) आणि बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) यांनाही 10 दिवस आयसोलेशनमध्ये जावं लागलं होतं, कारण हे तिघं दयानंद गरानी (Dayanand Garani) यांच्या संपर्कात आले होते. आता भारत-श्रीलंका सीरिजमध्येही कोरोनाचं प्रकरण समोर आलं आहे. वनडे सीरिजआधी श्रीलंका टीमचे दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले होते. बॅटिंग प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि जीटी निरोशन यांना कोरोना झाला होता, त्यामुळे वनडे आणि टी-20 सीरिजचं वेळापत्रक बदलण्यात आलं होतं. भारत-श्रीलंका यांच्यात मंगळवारी होणारी टी-20 मॅच आता बुधवारी होणार आहे, पण त्याआधी भारताच्या सगळ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह यावी लागणार आहे. तसंच तिसऱ्या टी-20 च्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.