मुंबई, 01 जानेवारी : ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. पण भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. या पराभवानंतर भारतीय संघाच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. काही खेळाडूंची संघात निवड केली असताना त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्यानं टीकाही करण्यात आली. आता पुन्हा एकदा या सगळ्यावरून टी20 वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळलेल्या दिनेश कार्तिकने मोठं वक्तव्य केलं आहे. युझवेंद्र चहलला टी२० वर्ल्ड कपवेळी भारतीय संघात संधी मिळाली होती. मात्र संपूर्ण स्पर्धेत त्याला एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं नव्हतं. त्याला संधी न दिल्यानं सेमीफायनलमध्ये भारताला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं अशी टीका रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर झाली. यावर चहलच्या मुद्द्यावरून दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा : IPL, WTC आणि दोन वर्ल्ड कप; नव्या वर्षात टीम इंडियाचं कसं असेल शेड्युल? दिनेश कार्तिक म्हणाला की, चहलला संधी दिली असती तर तो प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकला असता. प्रामाणिकपणे सांगायचं तर अश्विने स्पर्धेची सुरुवात चांगली केली. पण शेवट चांगल्या पद्धतीने करू शकला नाही. चहल विरोधी संघांना अधिक नुकसान पोहचवू शकत होता. तो चांगला पर्याय ठरला असता. मात्र आता परिणाम आल्यानंतर या गोष्टीकडे पाहणं आश्चर्यचकीत करणारं आहे. भारताने टी २० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. भारताला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडने सामना १० विकेटने जिंकून अंतिम फेरी गाठली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.