मुंबई, 7 जुलै : महान अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं बुधवारी दीर्घ आजाराने निधन झालं. दिलीप कुमार यांच्या जाण्यानं बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनयाबरोबरच दिलीप कुमार यांना क्रिकेटबद्दलही विशेष प्रेम होतं. 1983 वर्ल्ड कपच्या काही वर्ष आधी त्यांनी एका क्रिकेटपटूला भारतीय टीममध्ये घेण्याबाबत शिफारस केली होती. भारताने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्याच्या नावावर 89 आणि 61 रनच्या महत्त्वाच्या खेळी होत्या. या क्रिकेटपटूच्या 61 रनच्या खेळीमुळे भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता.
भारताचे माजी बॅट्समन यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांची 1983 च्या वर्ल्ड कप (1983 World Cup) विजयात मोलाची भूमिका राहिली. दिलीप कुमार यांनी आपलशी शिफारस केल्याचं खुद्द यशपाल शर्मा यांनी सांगितलं. 'तुम्ही त्यांना दिलीप साहेब म्हणता, मी युसूफ भाई म्हणतो. त्यांचा एक किस्सा आहे. क्रिकेटमध्ये माझं आयुष्य घडलं ते युसूफ भाईंमुळे,' असं यशपाल शर्मा म्हणाले.
यशपाल शर्मा यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतच्या आपल्या भावनिक नात्याबाबत दोन वर्षांपूर्वी द कपिल शर्मा शो मध्ये विस्ताराने सांगितलं.
'मी तेव्हा रणजी प्लेयर होतो. एका कंपनीच्या ग्राऊंडवर नॉक आऊट मॅच सुरू होती, ज्याचे ते अध्यक्ष होते. पहिल्या इनिंगमध्ये मी शतक केलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये 80 च्या आसपास खेळत होतो. तेव्हा काही गाड्या आल्या. मला वाटलं कोणीतरी नेता असेल. मी शतक केलं, त्यानंतर त्यांनी टाळ्या वाजवल्या. मॅच संपल्यानंतर स्टेडियममधल्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं तुम्हाला कोणतरी भेटण्यासाठी थांबलं आहे. जेव्हा मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा समोर युसूफ भाई उभे होते. त्यांनी माझ्यासोबत हात मिळवला आणि म्हणाले तुझ्यात दम आहे. तुझ्यासाठी मी कोणाशीतरी बोलेन,' अशी आठवण यशपाल शर्मांनी सांगितली.
दिलीप कुमार यांनी यानंतर यशपाल शर्मांच्या खेळाबाबत राजसिंग डुंगरपूर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी डुंगरपूर बीसीसीआयमध्ये दखल देत होते. दिलीप कुमार यांनीच आपल्याकडे तुझी शिफारस केल्याचं डुंगरपूर यांनी नंतर यशपाल शर्माना सांगितलं. 'पंजाबचा एक मुलगा रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे, मी त्याची बॅटिंग बघून आलो आहे,' असं दिलीप कुमार यांनी डुंगरपूर यांना सांगितलं. यानंतर डुंगरपूर यांनी यशपाल शर्मांबाबत बीसीसीआय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यशपाल शर्मा 1980 च्या दशकात भारताचे प्रमुख आणि विश्वासू बॅट्समनपैकी एक होते. 1983 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 89 रनची खेळी केली होती. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्यांनी 61 रन केले. भारताने या सामन्यात इंग्लंडचा 6 विकेटने पराभव केला आणि यशपाल शर्मा सर्वाधिक रन करणारे खेळाडू होते. याच सामन्यात त्यांनी इंग्लंडचे दिग्गज बॅट्समन एलन लॅम्ब यांना डायरेक्ट हिट मारून रन आऊट केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Dilip kumar