मुंबई, 10 जून: टीम इंडियाचा प्रमुख मॅच विनर बॅट्समन म्हणून युवराज सिंहची (Yuvraj Singh) ओळख होती. टी 20 वर्ल्ड कप 2007 (T20 World Cup 2007) आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 (Cricket World Cup 2011) विजेतेपदामध्ये युवराजचा महत्त्वाचा वाटा होता. या सर्व योगदानानंतरही युवराज कधीही टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही. युवराज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता दोन वर्ष झाली आहेत. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये युवराजने आपल्याला कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, असा खुलासा केला आहे.
गौरव कपूरच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये युवराजने हा खुलासा केला. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आपल्याला कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) कॅप्टन म्हणून नाव जाहीर झालं, असं युवराजने सांगितले.
"भारताचा त्यावर्षी झालेल्या 50 ओव्हर्सच्या वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडियामध्ये बऱ्याच घटना घडत होत्या. इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये या देशांचा दोन महिन्यांचा दौरा होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत टी 20 वर्ल्ड कप होणार होता. त्यावेळी टीममधील सीनियर्सनी ब्रेक घेण्याचे ठरवले होते.कुणीही टी 20 वर्ल्ड कप गांभीर्याने घेतला नव्हता. मला मात्र त्यावेळी कॅप्टन होईल असे वाटले होते, पण धोनीच्या नावाची कॅप्टन म्हणून घोषणा झाली." असे युवराजने सांगितले.
महेंद्रसिंह धोनी कॅप्टन झाल्यानंतर त्याच्यात आणि आपल्या संबंधांमध्ये याचा कोणताही परिणाम झाला नाही, असे युवराजने सांगितले. टीमचा कॅप्टन राहुल द्रविड, सौरव गांगुली किंवा अन्य कुणीही असला तरी एक टीममधील खेळाडू म्हणून शंभर टक्के योगदान देणे हे माझं काम होतं, असं युवराजने स्पष्ट केले.
मुंबईत जन्मलेल्या खेळाडूचा न्यूझीलंडच्या टीममध्ये समावेश, भारताविरुद्धही खेळणार!
महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टनसीखाली टीम इंडियाने 2007 साली झालेला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. या विजेतेपदात युवराजची महत्त्वाची भूमिका होती. या वर्ल्ड कप विजेतेपदानंतरच भारतीय क्रिकेटमध्ये धोनी युगाला सुरुवात झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, MS Dhoni, Yuvraj singh