मुंबई, 14 मार्च : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विरोधातील लढाईमध्ये भारताची अग्रणी भूमिका आहे. जगाची परीक्षा पाहणाऱ्या या कालावधीमध्ये भारताने मैत्री अभियानाच्या अंतर्गत (Vaccine Maitri) अनेक देशांना कोरोना वॅक्सिनचा (Corona Vaccine) पुरवठा केला आहे. भारताने मागच्या आठवड्यात वेस्ट इंडिज बेटावरच्या अॅण्टिग्वा, बार्बोडस, सेंट किट्स आणि नेविस, सेंट विंसेन्ट, सुरीनाम यासारख्या कॅरिकॉम देशांना कोरोना वॅक्सिनचा डोस दिला आहे. भारताच्या या उदारतेबद्दल वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी आभार व्यक्त केले आहेत. ‘डीडी न्यूज’ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन व्हिवियन रिचर्ड्स (Vivian Richards), रिची रिचर्डसन (Richie Richardson), तसंच जिमी अॅडम्स (Jimmy Adams) यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. व्हिवियन रिचर्ड्स यांनी अॅण्टिग्वा आणि बार्बोडस देशांच्या नागरिकांच्या वतीने मोदींचे आभार मानले आहेत. ‘भारताने आम्हाला कोरोना वॅक्सीनचा पुरवठा केला, त्यामुळे आमचे संबंध आणखी घट्ट झाले आहेत,’ अशी भावना रिचर्ड्स यांनी व्यक्त केली आहे. तर रिची रिचर्ड्सन यांनी भारताने 40 हजार डोस पाठवल्याबद्दल भारत सरकार आणि मोदींचे आभार व्यक्त केले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे संचालक जिमी अॅडम्स यांनी भारत सरकारच्या या अभियानामुळे कॅरिकॉम देशांना खूप फायदा होईल. मी जमेका देशवासियांच्या वतीने मोदींचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
( वाचा : IPL 2022 मध्ये खेळणार 10 टीम, ‘या’ महिन्यात होणार लिलाव ) कॅरीकॉम हा 20 देशांचा समुह आहे. या समुहाची लोकसंख्या 1.6 कोटी आहे. भारताने यापूर्वी मेैत्री अभियानाच्या अंतर्गत भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका या देशांना कोरोना वॅक्सिनचा पुरवठा केला आहे.