मुंबई, 8 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. या दोन पराभवाला अतिक्रिकेटमुळे आलेला थकवा कारणीभूत आहे, असा दावा टीम इंडियाचा बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानं केला होता. त्यानंतर रविवारी टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरूण (Bharat Arun) यांनीही हेच कारण दिलं होतं. या दोघांच्या वक्तव्यावर BCCI नं नाराजी व्यक्त केली आहे.
काय होतं वक्तव्य?
टी20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीबद्दल बोलताना भरत अरुण यांनी सांगितले होते की, '6 महिने घरापासून दूर राहणे ही मोठी गोष्ट आहे. IPL स्पर्धा स्थगित झाल्यानं त्यांना छोटा ब्रेक मिळाला होता. पण त्यानंतर खेळाडू घरी गेलेले नाहीत. ते 6 महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहेत. याचा खूप मोठा परिणाम मनावर आणि शरीरावर होतो. आयपीएल आणि टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान एक छोटा ब्रेक खेळाडूंसाठी फायदेशीर ठरला असता.' असं अरुण यांनी स्पष्ट केलं.
बुमराहनं देखील न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचनंतर बोलताना खराब कामगिरीसाठी थकवा हे कारण असल्याचं सांगितलं होतं. 'तुम्हाला अनेकदा ब्रेकची गरज असते. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना मिस करता. सतत सहा महिने क्रिकेट खेळल्याचा परिणाम मनावर कुठेतरी होतोच. अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात. कोण, कधी, कुणाविरुद्ध खेळणार याचा कार्यक्रम तयार केला जातो. त्यामुळे बबलमध्ये राहणे आणि कुटुंबापासून इतका कालावधी दूर राहण्याचा परिणाम मनावर होतो. बीसीसीआयनं त्यांच्या बाजूनं बरेच प्रयत्न केले. पण बबलमध्ये सतत राहिल्यानं खेळाडू मानसिकरित्या थकतात.' असा दावा बुमराहनं केला होता.
टीम इंडियाचे 3 खेळाडू ठरले विराटसाठी व्हिलन, शेवटच्या स्पर्धेतही नामुश्की
बीसीसीआयची थेट प्रतिक्रिया
'इनसाईड स्पोर्ट्स' नं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयनं या दोन्ही वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत मत व्यक्त केलं आहे. 'बायो-बबलमुळे होणाऱ्या थकव्याचा विषय असेल तर कोणत्याही खेळाडूला आयपीएल स्पर्धेत खेळण्याची बळजबरी करण्यात आली नव्हती. विराट किंवा बुमराहला वर्ल्ड कप स्पर्धा जास्त महत्त्वाची वाटत असेल तर आयपीएल स्पर्धा खेळायला नको होती. बीसीसीआयनं त्यांना सर्व सुविधा दिल्या होते. त्यांचे कुटुंबीय देखील सोबत होतो. कोरोना काळामुळे सर्वजण कठीण परिस्थितीतून जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, IPL 2021, Jasprit bumrah, T20 world cup