मुंबई, 12 सप्टेंबर : कोरोना महामारीमुळे देशांतर्गत रणजी क्रिकेटचा (Ranji Trophy) मागील सिझन होऊ शकला नाही. त्यामुळे खेळाडूंना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांची ही आर्थिक चणचण आता दूर होणार आहे. बीसीसीआयच्या विशेष समितीनं याबाबत शिफारस केली असून त्यावर अंतिम निर्णय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) घेतील. कोरोना महामारीच्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट तर सुरू झालं आहे. पण देशांतर्गत क्रिकेट अजूनही पूर्णत: सुरू झालेलं नाही. त्यामुळे खेळाडूंना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नावर बीसीसीआयनं विशेष समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये टीम इंडियाचे माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीन, युधवीर सिंह, संतोष मेनन, जयदेव शाह, अविषेक डालमिया, रोहन जेटली आणि देवजीत सैकिया यांचा समावेश होता. या समितीनं केलेल्या शिफारशींवर आता गांगुली आणि जय शहा 20 सप्टेंबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीच्या बैठकीत चर्चा करणार आहेत. खेळाडूंना किमान 50 टक्के नुकसान भरपाई मिळावी असं मत या समितीच्या बहुतेक सदस्याचं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. IND vs ENG: टीम इंडियावर आरोप करणाऱ्यांना गावसकरांनी सुनावलं, शास्त्रींबद्दल म्हणाले… सध्या रणजी ट्रॉफीतील प्लेईंग 11 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रतिदन 35 हजार आणि प्रत्येक मॅचची 1 लाख 40 हजार फिस मिळते. त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना किमान 70 हजार रुपये प्रति मॅच नुकसान भरपाई मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.