मुंबई, 1 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. या टीममध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांची निवड झाली आहे. अय्यरला यापूर्वी न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत संधी मिळाली होती. तर ऋतुराजचा श्रीलंका दौऱ्यातील टीम इंडियामध्ये समावेश होता. मात्र या दोन्ही खेळाडूंची निवड होण्यात आयपीएल स्पर्धेतील त्यांची दमदार कामगिरी निर्णायक ठरली आहे. विजय हजारे स्पर्धेमुळे वन-डे टीमची निवड उशीरा करण्यात आली असे सांगण्यात आले. या स्पर्धेत अनेक तरूण खेळाडू सहभागी झाले होते. पण, या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या किती खेळाडूंचा टीममध्ये समावेश झाला हा प्रश्न आहे. या स्पर्धेत ऋतुराजनं सर्वाधिक 603 रन केले. पण, तो यापूर्वी देखील टीम इंडियाकडून खेळलेला आहे. हिमाचल प्रदेशचा कॅप्टन ऋषी धवननं (Rishi Dhawan) विजय हजारे स्पर्धेत ऋतुराजच्या खालोखाल 458 रन काढले तसंच 17 विकेट्स घेतल्या. धवनच्या कॅप्टनसीमध्ये हिमाचल प्रदेशनं पहिल्यांदाच विजय हजारे स्पर्धा जिंकली. हिमाचल प्रदेशचा प्रशांत चोप्रा 456 रनसह तिसऱ्या, मध्य प्रदेशचा शुभम वर्मा 428 रनसह चौथ्या तर मनन व्होरा 379 रनसह पाचव्या क्रमांकावर होता, पण, यापैकी कुणालाही वन-डे सीरिजमध्ये संधी मिळाली नाही. IND vs SA: टीम इंडियात नव्या खेळाडूंची एन्ट्री, 57 शतक करणाऱ्या दिग्गजाची जागा धोक्यात विदर्भाचा 23 वर्षांचा फास्ट बॉलर यश ठाकूरनं विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेट देखील 6 पेक्षा कमी होता. तरीही त्याची टीममध्ये निवड झाली नाही. ऋषी धवन 17 विकेट्ससह दुसऱ्या तर वॉशिंग्टन सुंदर 16 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर होता. यामधील सुंदर यापूर्वी टीम इंडियाकडून खेळला आहे. त्यामुळे त्याची पुन्हा निवड होणे हे अपेक्षित मानले जात होते. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन-डे मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.