चेन्नई, 15 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सध्या सुरू असलेली टेस्ट एका कारणामुळे खास आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरसनंतर पहिल्यांदाच मैदानात प्रेक्षकांना क्रिकेट मॅच पाहण्यास परवानगी देण्यात आली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी BCCI नं एक ट्विट करत प्रेक्षकांचं स्वागत केलं होतं. चेन्नईच्या मैदानावर 12 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या एका घटनेमुळे मैदानातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. चेन्नई टेस्ट पाहण्यासाठी आलेला एक तरुण स्टँडवरील रोलिंग ओलांडून मैदानात पोहचला होता. लंच ब्रेकच्या दरम्यान इंग्लंडची टीम प्रॅक्टीस करत असताना ही घटना घडली. हा तरुण खेळाडूंच्या जवळ जाण्याच्या आत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
भारताची भक्कम आघाडी मैदानात झालेल्या या घुसखोरीचा अपवाद वगळता चेन्नई टेस्ट अगदी रंगतदार सुरू आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांनी भारताची इनिंग सावरली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 96 रनची भागिदारी केली. विराटनं 149 बॉलमध्ये 62 रन केले. विराट कोहलीचं हे 25 वं अर्धशतक आहे. विराटप्रमाणेच अश्विननंही अर्धशतक झळकावलं आहे. या दोघांच्या अर्धशतकामुळे भारतानं 400 पेक्षा जास्त रनची आघाडी घेतली आहे. ( वाचा : IND vs ENG : ‘आणखी किती धावा हव्या?’; रणवीरनं उडवली इंग्लिश खेळाडूंची खिल्ली ) यापूर्वी भारतानं पहिल्या सत्रामध्ये 5 विकेट्स गमावल्या. पहिल्या डावातील शतकवीर रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 26 रन्सवर आऊट झाला. बेन फोक्सनं त्याला सुरेख पद्धतीनं आऊट केलं. त्यापूर्वी भारतीय टीमची नवी वॉल असलेला चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं रन आऊट झाला. अजिंक्य रहाणेच्या आधी आलेला पंत फार कमाल करू शकला नाही. पंत फक्त 8 रन काढून आऊट झाला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेला रहाणे दुसऱ्या डावात झटपट आऊट झाला. रहाणेनं फक्त 10 रन काढले. अक्षर पटेलही 7 रन काढून आऊट झाल्यानं भारताचा डाव लवकर संपण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावेळी विराट – अश्विन जोडीनं संयमी खेळ करत भारताचा डाव सावरला.