सागर सुरवसे, सोलापूर
20 जून : पोटच्या गोळ्याला चोरुन नेण्याच्या भयगंडाने ग्रासलेल्या समाजाकडून हातावर पोट असलेल्या लोकांचे जीणं हराम करुन टाकलेय. इतकेच नव्हे तर त्यांचा जगण्याचा अधिकारही हिरावून घेण्याचा प्रकार सोलापूरसह राज्यातील विविध भागात पाहायला मिळत आहे. याबद्दलचा हा संतापजनक रिपोर्ट...
VIDEO :'शिशिर शिंदेंच्या 'घरवापसी'मुळे राज ठाकरे दुखावले'
औरंगाबाद जिल्ह्यातलं अफवाचं पेव आता सोलापुरात पोहोचलंय. पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भटकून पितळ आणि तांब्याचे भांडे पॉलिश करण्यासाठी परराज्यातून आलेल्या तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. सोलापुरातील निलम नगर भागात जमावानं ही मारहाण केली. मारहाणीचं कारण ठरलं सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवा.
आपल्या मुलांना कोणीतरी पळवून नेईल ही भिती रास्त असली तरी त्याची शाहनिशा न करता नागरिक बिनदिक्कतपणे कायदा हातात घेत आहेत. पोलिसांनी अफवांना बळी न पडण्याचं आवाहन केलं असलं तरी भयगंडानं पछाडलेल्या नागरिकांना कोण आवरणार हा प्रश्न आहे?
राज्याच्या ग्रामीण भागात सध्या लहान मुलं पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवानी अक्षरश: हैदोस घातलाय. आत्तापर्यंत अशा अफवांमुळे दोघांना जीव गमवावा लागलाय तर अनेक जणांचा कसाबसा जीव वाचलाय. त्यामुळे दिवसा रस्त्यावरून फिरणंही मुश्किल झालंय. नागरिक कायदा हातात घेत असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. हे सगळं रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.