गौरव सिंह, प्रतिनिधी भोजपूर, 16 जून : आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण आपण देवाला सांगत असतो, शिवाय कोणतीही अडचण येण्यापूर्वीच सगळं काही सुरळीत होऊदे असं मागणं आपण देवाकडे मागत असतो. आपल्या देशात अशी अनेक देवस्थानं आहेत जिथे प्रार्थना केल्यावर भक्तांच्या इच्छा निश्चितपणे पूर्ण होतात असं मानलं जातं. असंच एक मंदिर बिहारच्या आरा भागात आहेत, जिथे माता राणीची पूजा केल्यावर देवी बेरोजगारांना हमखास नोकरी मिळवून देते, अशी मान्यता आहे. खरंतर या भागातील प्रत्येक घरात एकतरी फौजी किंवा पोलीस आढळतो. ही माता राणीचीच कृपा असल्याचं येथील लोक मानतात. देवीची माया वर्षानुवर्षे भक्तांवर असल्याने या देवस्थानाला महामाया माई या नावाने ओळखलं जातं. दूर-दूरहून लोक देवीच्या दर्शनासाठी याठिकाणी येतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर तिचे आभारही मानतात. महामाया माईचे हे मंदिर आरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपरा गावात आहे. मंदिरासमोरील मोठ्या मैदानात तरुणमंडळी पोलीस दलात, सैन्य दलात दाखल होण्यासाठी दिवसरात्र शारीरिक कसरत करतात. केवळ पिपराच नाही, तर आजूबाजूच्या शलेमपूर, बहरा, अगरसंडा, पवट, पुरुषोत्तमपूर, इत्यादी गावातील तरुणही याठिकाणी येतात आणि नोकरी मिळाल्यावर आपला पहिला पगार देवीच्या चरणात अर्पण करतात. खरंतर त्यातूनच केवळ एक खोली असलेल्या या मंदिराची वास्तू आता भव्य झाली आहे. मंदिराची देखभालही मैदानात कसरत करणारी तरुणमंडळीच करतात.
मंदिराचे पुजारी जयशंकर पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देवी याठिकाणी कधी विराजमान झाली याचा इतिहास कोणालाच ठाऊक नाही. मात्र असं सांगितलं जातं की, याठिकाणी शेकडो वर्षांपूर्वी घनदाट जंगल होतं. तेव्हापासून महामाया आई जंगलाच्या मध्यभागी विराजमान आहे.’ Kitchen Jugaad : केस विंचरल्यानंतर कंगव्याचा असा करा वापर; दिसेल ‘जादुई’ परिणाम त्याचबरोबर या मंदिराकडे जिल्हा प्रशासनाने कधीच लक्ष दिलेलं नाही. मिळालेल्या देणग्यांमधूनच मंदिराचा उद्धार झाला आहे, अशी खंतही पुजाऱ्यांनी बोलून दाखवली. तसेच हे मंदिर जर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं तर त्याची कीर्ती आणखी सर्वदूर पसरेल आणि लोकांना रोजगाराचं साधन मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)