प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 14 जून : वारकरी संप्रदायाला एक मोठी परंपरा आहे. दरवर्षी विठ्ठलाच्या नावाचा जप करत लाखो वारकरी पायी पंढरीची वारी करत असतात. गळ्यात तुळशी माळा, कपाळी गोपीचंदणाचा टिळा, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मृदंग, भगवी पताका आणि मुखानं हरीनामाचा गजर करत अनेक वारकरी पंढरीच्या दिशेने निघत असतात. यावेळी भजन कीर्तनात वारकरी विठू नामाचा गजर करत फुगडी खेळतानाही दिसतात. याच फुगडीचं वारकरी सांप्रदायात महत्त्व असून त्यावर अभंगही आहेत. तुळशी माळ आणि वृंदावन तुळशी माळ आणि तुळशी वृंदावन ही वारकऱ्यांची दोन प्रतीके आहेत. आधुनिक वैद्यक म्हणजेच आयुर्वेदात सुद्धा तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म नमूद केले आहेत. समुद्रमंथनात निघालेल्या अमृताचे काही थेंब जिथे सांडले तिथे तुळशीची उत्पत्ती झाली अशी आख्यायिका सांगितली जाते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला शुद्ध करणारी तुळशी विष्णूला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या वारीत तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावनाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे सोलापूर जिल्ह्यातील पापरीचे कीर्तनकार अरुण माळी सांगतात.
वारकऱ्यांसाठी फुगडीचे महत्त्व ज्ञानदेवा गोडी, केली संसारा फुगडी! असं ज्ञानेश्वर माऊलींनी एका अभंगात म्हटलं आहे. वारकरी संप्रदायात फुगडीचेही तितकेच महत्त्व आहे. वारीत फुगडी खेळला नाही असा वारकरी सापडणार नाही. वैष्णव जन वाळवंटी निरनिराळे खेळ खेळतात. हे खेळ खेळत असताना ते मनातला द्वैत भाव विसरून जातात. भेदाभेद विसरतात. क्रोध, अभिमान पायदळी टाकून ते एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतात, असंही कीर्तनकार माळी सांगतात. फुगडीचे अनेक प्रकार भजन कीर्तनात वारकरी विविध प्रकारची फुगडी खेळतात. बसफुगडी, दंडफुगडी, जातेफुगडी, नकुल्या, भुईफुगडी इत्यादी फुगडीचे अनेक प्रकार आहेत. इतरही अनेक खेळ या फुगडीच्या जोडीने खेळले जातात. हे खेळ वारकऱ्यांना वारीत पुढे चालण्यासाठी ऊर्जा देतात. त्यामुळे वारीत फुगडीचे विशेष महत्त्व आहे, असंही माळी यांनी सांगितलं. ना कोणता रंग, ना धर्म, अशी असते वारी, एकतेचा संदेश देणारा खास Video ध्वज पताका महत्त्वाचं प्रतीक वारकऱ्यांच्या हातात असणाऱ्या भगव्या ध्वजाला पताका असं म्हटलं जातं. ते एक मांगल्याचं प्रतीक असतं. जे वारीतील वारकऱ्यांना माऊलींच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देतं. हे वेगवेगळे खेळ आणि प्रतीक वारकऱ्यांना दिंडीत आनंदी ठेवतात आणि त्याच आनंदात वारकरी विठुरायाचे नामस्मरण करतो. विठ्ठलाच्या चरणी लीन होतो, असंही माळी यांनी सांगितलं.