भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 18 जून: वारकरी सांप्रदाय हा जात, धर्म, लिंग भेद विसरून शुद्ध भक्ती मार्ग सांगणारा सांप्रदाय मानला जातो. या ठिकाणी ‘माऊली’ याच संबोधनात सर्व सान-थोर एकत्र येतात. देहभान विसरून टाळ, मृदंगाच्या घोषात विठू नामाचा गजर करतात. दरवर्षी आषाढी कार्तिकीला दिंड्या पताका घेऊन लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात. अलिकडे मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित तरुणही वारकरी सांप्रदायाच्या वैचारिक आणि अध्यात्मिक शिदोरीने भारावत आहेत. तरुणाईचा वारकरी सांप्रदायाकडे ओढा भजन, कीर्तन ऐकलं की मन विठ्ठलाच्या चरणी लीन होतं. सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी भजन, कीर्तन केलं जातं. मुखातून सदैव विठू नामाचा जप व्हावा हा त्यामागचा हेतू असतो, असं डोंबिवलीतील तरुण सांगतात. त्यामुळं वारकरी सांप्रदायाच्या अध्यात्मिक वातावरणाकडे तरुण मंडळीचा ओढा कायम असल्याचं डोंबिवली शहरात दिसून येतंय. डोंबिवलीतील तरुण मोठ्या प्रमाणात वारकरी सांप्रदायाशी जोडले जात असून भजन, कीर्तनात तल्लीन होत आहेत.
वारकरी सांप्रदायिक वारसा जपण्याचा प्रयत्न डोंबिवली शहराच्या आजूबाजूच्या 85 गावांमध्ये वारकरी सांप्रदाय विस्तारलेला आहे. घरात परंपरेने चालत आलेला वारसा जपण्याचे काम आता येथील तरुणाई करत आहे. या तरुण वारकरी मंडळींनी एकत्र यावे यासाठी जयेश भाग्यवंत प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे ही सर्व तरुण मंडळी उच्च शिक्षित आहेत. भजन, कीर्तन, अभंग या सर्व गोष्टींमुळे आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते. माऊली ही सेवा आमच्याकडून करून घेतात असे ही तरुण मंडळी सांगतात. वारीत महिला डोक्यावर तुळस घेऊन का जातात? पाहा काय आहे महत्त्व Video सद्गुरु माऊली अध्यात्मिक सेवा संस्थानची उभारणी जयेश भाग्यवंत यांनी युवकांचं संघटन करून ‘सद्गुरुमाऊली अध्यात्मिक सेवा संस्थान’ सुरु केले आहे. या संस्थेद्वारे वर्षाकाठी एक अध्यात्मिक कार्य म्हणून ‘गुरुस्मरण सोहळा’ संपन्न होतो. या सोहळ्यात कीर्तनाला 250 हून अधिक तरुण टाळकरी वर्ग उपस्थित असतो. यामुळे तरुण मंडळी व्यसनाकडे वळत नाहीत. त्याचबरोबर एक वेगळा उत्साह तरुणांना मिळतो. याच सकारात्मक ऊर्जेचा उपयोग आम्हाला करियर मध्येही होतो, अशी माहिती वारकरी भूषण याने दिली.