मुंबई, 09 एप्रिल : यंदा 06 एप्रिल रोजी हनुमान जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. भाविकांनी हनुमानाची पूजा करून आशीर्वाद घेतले. मंदिरांमध्ये हनुमानाची आरती, सुंदरकांड, हनुमान चालिसेचा गजर करण्यात आला होता. असं मानलं जातं की, बजरंगबली आजही पृथ्वीवर आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार हनुमान अमर आहे. बजरंगबली आजही प्रत्यक्ष पृथ्वीवर आहेत, अशी पौराणिक मान्यता आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की, बजरंगबली व्यतिरिक्त असे आणखी 7 चिरंजीवी आहेत.
1. भगवान परशुराम: भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार मानले जातात. असे मानले जाते की, परशुराम हे अजगर अमर आहेत.ते सशरीर आजही पृथ्वीवर आहेत. त्यांचा जन्म वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो, याला अक्षय्य तृतीया म्हणतात.
2. राजा बली: राक्षस राजा राजाबलीबद्दल देखील असे मानले जाते की, ते देखील अमर आहे. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनदेव यांना पृथ्वी आणि स्वर्गासह सर्व काही दान केल्याच्या बदल्यात भगवान विष्णूकडून पाताळ लोकात अमर राहण्याचे वरदान मिळाले होते.
3. मार्कंडेय ऋषी: पौराणिक कथेनुसार, मार्कंडेय ऋषी हे भगवान शिवाचे प्रखर भक्त होते. असे मानले जाते की, त्यांनी भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले. त्यांनी तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि महामृत्युंजय मंत्र सिद्धीमुळे ते चिरंजीवी झाले.
4. विभीषण: असे मानले जाते की, रावणाचा धाकटा भाऊ विभीषण देखील अमर आहे. रावणाच्या वधानंतर भगवान श्रीरामांनी विभीषणाला लंकेचा राजा बनवण्यासोबतच अमरत्वाचे वरदान दिले.
5. महर्षी वेद व्यास: वेद व्यासांनी महाभारत लिहिलं. महर्षी वेद व्यास यांना कलिकालच्या अंतापर्यंत जगण्याचे वरदान आहे, अशी पौराणिक समजूत आहे.
6. अश्वत्थामा: वरदानामुळे अमर झाल्याची कथा तुम्ही ऐकली असेल. पण, एका शापामुळे अश्वत्थामा अमर आहे. असे मानले जाते की, महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूने लढताना अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडले मात्र ते परत घेऊ शकले नाही. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने त्याला अनंतकाळपर्यंत पृथ्वीवर भटकण्याचा शाप दिला.
हे वाचा - सोमवारी केलेली ही कामं लाभदायी ठरतात, महादेवाची कृपा संपूर्ण कुंटुंबावर राहते
7. कृपाचार्य: कृपाचार्य एक महान ऋषी होते. ते अश्वत्थामाचे मामा आणि कौरवांचे कुलगुरू होते. महाभारताच्या युद्धात कौरवांच्या वतीने कृपाचार्य ऋषींनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांना चिरंजीवीचे वरदानही लाभले होते. कृपाचार्यही अमर आहेत असे, मानतात.
8. हनुमान: हनुमान आजही पृथ्वीवर भौतिकरित्या उपस्थित आहे, असे मानले जाते. असे सांगितले जाते की, जेव्हा भगवान श्रीराम अयोध्या सोडून वैकुंठाला जाऊ लागले, तेव्हा हनुमानाने त्यांना पृथ्वीवर राहण्याची विनंती केली. तेव्हा भगवान श्रीरामांनी त्याला वरदान दिले आणि सांगितले की, जोपर्यंत माझे नाव पृथ्वीवर आहे, तोपर्यंत तूही पृथ्वीवर राहशील, जेव्हा प्रलयानंतर पृथ्वीची निर्मिती होईल, तेव्हा तू या रूपात भक्तीचा प्रसार करशील. रामायणापासून महाभारतापर्यंत हनुमानाने अनेक लीला केल्या, हनुमानाला भगवान शिवाचा अवतार म्हटले जाते.
हे वाचा - सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)