चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 10 मार्च : पुणे भाजपचा बालेकिल्ला कसबा गमावल्यापासून पक्ष संघटनेत ब्लेम गेमचा खेळ चांगलाच रंगला आहे. आधी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना ट्रोल केलं गेलं आणि आता शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा घडवल्या जात आहेत. गंमत म्हणजे, जे लोक या निवडणुकीमध्ये पुढे होते तिच मंडळी पक्षांतर्गंत कुरघोड्या करण्यात पुढे आहेत. म्हणूनच मग सरतेशेवटी या कसबा निवडणुकीची संघटकपदाची जबाबदारी सांभाळलेल्या राजेश पांडे यांनी हे आम्हा सर्वांचेच सामूहिक अपयश असल्याचा खुलासा केला. पण तरीही ते पक्षांतर्गंत सुंदोपसुंदीवर सोईस्करपणे पडदा टाकू पाहत आहेत.
पुणे शहर भाजपातील शहराध्यक्ष विरोधी गटाकडून या कसब्याच्या पराभवाचं खापर जगदिश मुळिक यांच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत होताच त्यांनी सरळ हात वर केले. मला या इलेक्शनमध्ये फक्त अमित शाहंच्या दौऱ्याची जबाबदारी होती, असा खुलासा ते ऑफ द रेकॉर्ड करतात. तर राजेश पांडे यांनी कसबा पराभवाची कारणमिमांसा करणारा अहवाल प्रदेश भाजपला सुपूर्द केल्याचं सांगत शहराध्यक्ष बदलाचे अप्रत्यक्ष संकेतही दिले आहे.
वाचा - महाविकासआघाडीमुळे भाजपचा खेळ खराब होणार? पुण्याचे 3 मतदारसंघ डेंजर झोनमध्ये!
कसब्याच्या प्रचारात खरंतर प्रदेश भाजपने कुठलीच कसर ठेवली नव्हती. फडणवीस गटाचे सगळेच नेते हॉटेल जे डब्ल्यूमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे या पराभवाची संपूर्ण जबाबदारी ही चंद्रकांत दादा गटावर ढकलणं काहीसं अन्यायकारक होईल. पण या सगळ्या धांदलीत शहर आणि प्रदेश भाजपचे पदाधिकारी मात्र, प्रचार सोडून नेत्यांच्याच मागे फिरत होते आणि कसब्याच्या पराभवाचं एक कारण कदाचित तेही असू शकतं. पण बड्या नेत्यांच्या विरोधात कोण बोलणार? म्हणून मग ही सामूहिक पराभवाची टूम काढली गेली. काहीही असो... पण या पराभवाला पक्षाची रणनितीच चुकली होती हेही तितकंच खरं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune Bypoll Election