पुणे, 21 जानेवारी : पुण्यातल्या कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुका बिनविरोध होणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी या निवडणुका बिनविरोध होतील का, याबाबत शंका व्यक्त केली. सोमवार-मंगळवारी मुंबईत बसून महाविकास आघाडी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. तसंच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत. दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही कसब्याची पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेतील आम्ही त्यात नाक खुपसणे गरजेचं नाही. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी, अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का? याबाबत मला शंका आहे, असं ते म्हणाले. पोटनिवडणुका जाहीर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांची अधिसूचना 31 जानेवारीला जारी होणार आहे, तर 7 फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 8 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या निवडणुकांचं मतदान 27 फेब्रुवारीला होणार असून 2 मार्चला निकाल लागणार आहेत. काँग्रेस कसब्यातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस प्रदेश सचिव मोहन जोशी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कसब्यामध्ये भाजपकडून माजी नगरसेवक हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे लढण्याच्या तयारीत आहेत. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांच्या या भूमिकेबाबत पक्षाकडूनच उघड नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
याआधी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीवरून महाराष्ट्रात मोठं नाट्य रंगलं होतं. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत होती. या निवडणुकीत शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपनेही उमेदवार दिला. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या विनंतीनंतर भाजपने उमेदवार मागे घेतला आणि ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित झाला. आता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकाही बिनविरोध होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.