मुंबई, 2 मार्च : कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. कसब्याच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय महाविकासआघाडीचा नसल्याचं ते म्हणाले आहेत.
'आमच्या दोन्ही जागा निवडून येतील, असं अपेक्षित होतं. कसब्यामध्ये अतिशय चांगली मतं घेऊन देखील आम्ही विजयी होऊ शकलो नाही. जवळजवळ 45 टक्के मतं आम्हाला मिळाली आहेत, जी 2009 आणि 2014 पेक्षाही जास्त आहेत. कसब्यातला विजय महाविकासआघाडीचा नाही, कारण काँग्रेसच्या उमेदवाराने साधे राहुल गांधींचे फोटोही वापरले नाहीत. धंगेकर यांना नॅचरल सिम्पथी होती, आमच्या सर्व्हेमध्येही ती दिसत होती. पण ही सिम्पथी कमी होईल, असा आम्हाला विश्वास होता, पण ती शेवटपर्यंत राहिली, त्याच्यामुळे त्यांना हा विजय मिळाला आहे. कसाही मिळाला असला तरीही तो विजय आहे, त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो', असं फडणवीस म्हणाले.
'हा पराभव शिंदे-फडणवीस यांचा आहे, असं म्हणायचं असेल तर पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्या नेत्यांचा पराभव आहे? तुम्ही प्रचारामध्ये शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनाही उतरवलं. त्यामुळे इथे आमचा पराभव म्हणत असतील तर तिकडे त्यांचा पराभव म्हणावं लागेल', असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
'अलीकडे एखादा विजय मिळाला की आनंद गगनात मावेनासा होतो, कारण त्यांची विजयाची सवय तुटलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकरता मोठा आनंद आहे. आम्हाला विजयाचा सराव आहे, पण पराभवातून आम्ही आत्मचिंतन करतो, त्यामुळे कसब्याचंही आत्मचिंतन करू. पराभवांच्या कारणांचं विश्लेषण करू', असंही फडणवीस म्हणाले.
'उद्धव ठाकरेंना पुणे, चिंचवडमध्ये उमेदवार दिला नाही. दुसऱ्यांच्या घरात मुलगा झाला म्हणून पेढे वाटणं ठीक आहे, पण किती दिवस कराल?', असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis