मुंबई, 09 डिसेंबर : मेंडोस चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून उठणाऱ्या मेंडोस चक्रीवादळ थैमान घालण्यास सुरूवात झाली आहे. 11 ते 14 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रातील काही ठिकणी हवामानात बदल झाल्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वारेही वाहण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे.
11 ते 14 डिसेंबरपर्यंत असे चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम नाशिक, खान्देश ओलांडून मध्य प्रदेशाच्या बेतुल, बऱ्हाणपूर, देवास, होशंगाबाद, मांडला व छत्तीसगडच्या काही भागापर्यंत जाणवू शकतो. दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढलेले किमान तापमान व ढगाळ वातावरण पुढील 4-5 दिवस तसेच राहील, असे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
हे ही वाचा : दुर्गम भागातील तरुणानं सुरू केला आयुर्वेदिक चहाचा व्यवसाय, इतरांसाठी बनला आदर्श, Video
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे चेन्नईपासून 900 किमी आग्नेयेस जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर तिन्ही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नसला तरी दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर येणाऱ्या शुक्रवारी 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडूतील तिरुवरूर आणि तंजावर जिल्ह्यात पावसाच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती
बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ सध्या आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता नाही. याबाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळाचा विशेष परिणाम हा महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा : सावधान! थंडीत तुम्हीही शेकोटी पेटवता? एका चुकीने घेतला नागपुरातील महिलेचा जीव
चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीवर परिणाम होणार आहे. राज्यात सध्या असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे. थंडीला कदाचित आठवडाभरच अटकाव होण्याची शक्यता आहे.