वयाची सत्तरी ओलांडली की व्यक्तीला आधाराची गरज भासते. असे फार कमी लोक असतात जे सत्तरीनंतर स्वतःला स्वच्छ ठेवू शकतात, आरोग्य निरोगी ठेवू शकतात. अशातच तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हरियाणाच्या कारी मोद गावचे रहिवासी असलेले 71 वर्षीय रामचंद्र स्वामी यांनी नऊ वर्षांपूर्वी देश स्वच्छ ठेवण्याचा निश्चय केला आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली. यामागे कारणही होतं एकदम खास.
अनेकजणांना घर स्वच्छ ठेवायलादेखील कंटाळा येतो. परिसरही क्वचितच लोक जबाबदारीने स्वच्छ ठेवतात. अशात रामचंद्र स्वामी यांनी देश स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घेणं, ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे.
विशेष म्हणजे रामचंद्र स्वामी हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साक्षात कृष्णाचं रूप मानतात. तर, स्वतःला गरीब सुदाम म्हणवतात. याच प्रेमापोटी ते खास मोदींना भेटायला एकदा नाही तर दोनवेळा 170 किलोमीटर पायी चालून दिल्लीला गेले होते. मात्र दोन्हीवेळा मोदींची भेट होऊ शकली नाही. रामचंद्र हे ट्रक ड्रायव्हरचं काम करत असत. त्याचदरम्यान त्यांचं गुजरातला येणं-जाणं व्हायचं. तेव्हाच त्यांच्या मनात नरेंद्र मोदींविषयी प्रचंड आदर निर्माण झाला.
2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा होताच रामचंद्र यांनी नऊ दिवस उपवास केला होता. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान सुरू करताच रामचंद्र यांनी आपली ट्रक डायव्हरची नोकरी सोडली आणि हातात झाडू घेतला. ते त्यांच्या ओमनी कारमध्ये झाडू ठेवतात आणि विविध ठिकाणी जाऊन मुख्य बाजारपेठेत, चौका-चौकात सफाई करतात.
विशेष म्हणजे रामचंद्र या कामाचे पैसे घेत नाहीत. मागील 9 वर्षांपासून ते हे कार्य निःशुल्कपणे करत आहेत. गुजरातमध्ये स्वच्छता मोहीम राबवल्याचे त्यांच्याजवळ प्रमाणपत्रदेखील आहेत. त्यांनी त्यांच्या गाडीत झाडूसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोसुद्धा ठेवला आहे. आता आयुष्यात फक्त एकदा मोदींची भेट व्हावी, अशी इच्छा ते उराशी बाळगून आहेत.