अंजू आणि नसरुल्लाह 2019 साली सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. दोघांमध्ये मैत्रीही झाली. मागचं वर्षभर अंजू पाकिस्तानचा वीजा मिळवण्यासाठी भारतातल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या चकरा मारत होती. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अंजूला वीजा देण्याचे कष्टही उचलले नाहीत, पण भारतामध्ये सीमा हैदर प्रकरण गाजायला लागल्यावर 21 जुलैला अचानक पाकिस्तान उच्चायुक्तालयाने अंजूला वीजा दिला. यामागे आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारतीय दुतावासामध्येही पाकिस्तानी गुप्तचर विभागाचे अधिकारी असतात.
अंजू वीजा मिळाल्यानंतर गुपचूप भारताहून पाकिस्तानमध्ये गेली. अंजूने तिच्या नवऱ्यालाही याबाबतची माहिती दिली नाही. अंजूच्या नवऱ्यानेही ती गायब झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली नाही, त्यामुळे अंजू पाकिस्तानला पोहोचल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाला कुठून मिळाली? सुरूवातीला अंजू तिच्या पाकिस्तानमधल्या मित्राला भेटायला काही काळासाठी आल्याचं सांगण्यात आलं. यामुळे सीमा हैदर प्रकरणामध्ये झालेली किरकिरी धुण्यासाठी आयएसआयने अंजूच्या माध्यमातून हा कट तर रचला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अंजू पाकिस्तानला गेल्यानंतर तिचा एक व्हिडिओ लीक करण्यात आला. या व्हिडिओमध्ये ती आपण सीमा हैदरसारख्या नसल्याचं सांगत आहे. आपण फक्त पाकिस्तानमध्ये आपल्या मित्राला भेटण्यासाठी आलो आहोत. ही भेट झाल्यानंतर आपण भारतात परत जाऊ, असं अंजू म्हणत आहे. या व्हिडिओमध्ये अंजू आपण पाकिस्तानमध्येच असल्याचं कबूल करत आहे. हे आयएसआयनेच तिच्याकडून करून घेतल्याचाही संशय आहे.
अंजू व्हिडिओमध्ये आपण फक्त पाकिस्तानमध्ये मित्र असलेल्या नसरुल्लाहला भेटायला आल्याचं सांगते, तसंच त्याच्यासोबत निकाह करणार नसल्याचंही स्पष्ट करते. पण अचानक अंजूचं धर्मांतर केलं जातं आणि ती फातिमा बनते, यानंतर तिच्या लग्नाचा व्हिडिओ समोर येतो. दुसरीकडे सीमा हैदर भारतात आल्यापासूनच आपलं सचिनवर प्रेम आहे तसंच आपण हिंदू धर्म स्वीकारल्याचं सांगत आहे. याचा बदला म्हणून तर आयएसआयने अंजूचा वापर केला का? असा प्रश्न निर्माण होतोय.
अंजूच्या धर्मांतराच्या व्हिडिओमध्ये तिच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सुरक्षारक्षक दिसत आहेत. यानंतर दोघांचा निकाहनामा सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. मलकंद डिव्हिजनचे डीआयजी नासीर महसूद असा निकाह झाल्याचं कबूल करतात, तसंच तिचं नाव आता फातिमा असल्याचंही सांगतात, त्यामुळे यामागे आयएसआयचा हात असल्याच्या संशयाची सुई आणखी बळावते.