टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टी20 जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पण टीम इंडियाच्या या विजयात प्रत्येक खेळाडूनं मोलाचं योगदान दिलं. आधी बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवली. त्यानंतर सूर्यकुमार आणि राहुल या जोडीनं टीम इंडियाला विजयपथावर नेलं.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरनं संघाला दणक्यात सुरुवात करुन दिली. त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकन कॅप्टनला माघारी धाडलं. या सामन्यात दीपक चहरनं 4 ओव्हरमध्ये 24 रन्स देत 2 विकेट्स काढल्या.
अर्शदीप सिंग पहिल्या टी20त मॅन ऑफ द मॅच ठरला. त्यानं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट्स काढल्या. या सामन्यात त्याच्या बॉलिंगचं पृथ:करण होतं, 4-0-32-3
दीपक चहर आणि अर्शदीपला हर्षल पटेलचीही सुरेख साथ मिळाली. हर्षलनं आपल्या चार ओव्हरमध्ये 26 रन्स देताना 2 विकेट्स घेतल्या.
107 रन्सचं सोपं लक्ष्य असलं तरी भारताची सुरुवात खराब झाली. रोहित-विराट स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर लोकेस राहुलनं पीचवर ठाण मांडलं. त्यानं एकदम संथ सुरुवात केली. पण एकदा बॉलवर नजर बसताच मोठी खेळी साकारली. राहुलनं नाबाद 51 धावा केल्या.
सूर्यकुमार यादवची बॅट सध्या चांगलीच तळपली आहे. आशिया कप, मग ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आणि आता दक्षिण आफ्रिका. सूर्यानं आज पुन्हा एकदा मोठी खेळी केली. त्यानं 33 बॉल्समध्ये नाबाद 50 रन्स फटकावले. सूर्याचं आजवरचं हे आठवं टी20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठरलं.