आय़पीएलमध्ये मुंबई इंडियन्सला रोहित शर्माने पाचवेळा विजेतेपद पटकावून दिलं आहे. सध्या रोहित शर्मा ३६ वर्षांचा आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपनंतर बीसीसीआय रोहितच्या कर्णधारपदाबाबत निर्णय घेऊ शकते. त्याआधी कोणताच निर्णय होऊ शकणार नाही. भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये असून ७ जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार आहे. दहा वर्षांपासून भारतीय संघाला कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. यामुळे बीसीसीआयसह खेळाडूंवरही दबाव आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल ही रोहित शर्मासाठी कर्णधार म्हणून खूप महत्त्वाची असणार आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास रोहितच्या नेतृत्वावरून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. गेल्या वर्षी टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला इंग्लडकडून १० विकेटने पराभूत व्हावं लागलं होतं. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर नव्या कसोटी कर्णधाराच्या नावावर चर्चा नक्की होईल. सध्या भारतीय संघातील ३ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत.
रोहित शर्माकडून नेतृत्व काढून घेतल्यास त्याच्यानंतर कोणाकडे कसोटी संघाची धुरा सोपवायची असा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराहपासून ऋषभ पंतपर्यंत अनेक नावे यासाठी चर्चेत आहेत. सध्या हे दोघेही टीम इंडियातून बाहेर आहेत. तर केएल राहुलसुद्धा याआधी कर्णधार होता. मात्र त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसंच संघातही त्याचे स्थान पक्के नसते. सध्या दुखापतीनंतर पुनरागमन करण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.
हार्दिक पांड्याला अनेकदा टी२० संघाचे नेतृत्व दिलं होतं. याशिवाय एकदिवसीय संघाचा उप कर्णधारही झाला होता. पण कसोटीपासून त्याने स्वत:ला दूर ठेवलं आहे. २०२२ मध्ये सर्जरीनंतर तो पुन्हा संघात परतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पांड्याने कसोटी सामना खेळलेला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलआधी त्याने मी अजून कसोटी खेळण्यासाठी तयार नसल्याचं म्हटलं होतं.
रोहित शर्मानंतर कसोटी कर्णधार शोधणं बीसीसीआयसमोर आव्हान असणार आहे. चेतेश्वर पुजारा ते आर अश्विनसुद्धा ३६ वर्षांचा आहे. अजिंक्य रहाणेने पुनरागमन केलं आहे. मात्र त्याचे संघात स्थान पक्के नाही. श्रेयस अय्यरलासुद्धा दिग्गजांनी कर्णधार म्हणून पाहता येईल असं म्हटलंय. पण तोसुद्धा दुखापतीने संघाबाहेर आहे.