क्रिकेटमध्ये फलंदाज बऱ्याचा उसळता चेंडू लागून जखमी होतात. यात हॅमस्ट्रिंग, फ्रॅक्चर किंवा स्नायुंच्या तणावाचा समावेश आहे. यातून खेळाडूंची सुटका नसते पण तरीही अनेक खेळाडु वेदना बाजूला ठेवत संघासाठी मैदानात उतरतात आणि खेळतात. बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माने असंच केलं. अशा पद्धतीने जखमी असताना खेळलेला रोहित शर्मा पहिलाच नाही. इतरही अनेक खेळाडुंना याचा सामना करावा लागला आहे.
रोहित शर्मा - बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माला क्षेत्ररक्षणावेळी अंगठ्याला दुखापत झाली. त्याच्या अंगठ्यातून रक्त वाहू लागलं होतं. त्यानंतर रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो फलंदाजीला उतरण्याची शक्यता कमी होती. पण भारतीय संघाला गरज असल्याचं लक्षात येताच तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि 28 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तरीही भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात यश आलं नाही. रोहितचा अंगठा डिसलोकेट झाला होता आणि तो इंजेक्शन घेऊन मैदानात खेळायला आला होता.
अनिल कुंबळे - वेस्ट इंडिजविरुद्द 2002 मध्ये एंटिगा कसोटीत माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे जबड्याला दुखापत होऊनही खेळला होता. पट्टी बांधून त्याने गोलंदाजी केली होती. पहिल्या डावात ब्रायन लाराला बाद केलं होतं. त्यासाठी त्याने सलग 14 षटके गोलंदाजी केली होती. त्याआधीच्या कसोटी सामन्यात अनिल कुंबळेला मर्विन डिलियनचा एक उसळता चेंडू लागला होता. त्यामुळे रक्तस्रावही झाला होता. तेव्हा प्राथमिक उपचार केल्यानंतर कुंबळेने 20 मिनिटे फलंदाजीही केली. कसोटी सामना बरोबरीत सुटला पण अनिल कुंबळेने चेहऱ्याला पट्टी बांधून गोलंदाजी करत असलेला फोटो आजही भारतीय चाहत्यांच्या आठवणीत आहे.
गॅरी कर्स्टन - 2003 मध्ये लाहोर कसोटी सामन्यात शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर खेळताना गॅरी कर्स्टन यांना चेंडू लागला होता. 53 धावांवर खेळणाऱ्या कर्स्टन यांना तिथून उपचारासाठी नेण्यात आलं होतं. स्कॅनिंग केल्यानंतर त्यांचे नाक तुटल्याचं समोर आलं होतं. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची अवस्था 146 धावात 4 बाद अशी झाली होती. तेव्हा कर्स्टन फलंदाजीसाठी आले आणि 46 धावा काढल्या. पाकिस्तानने कसोटी जिंकली पण कर्स्टन यांची नाक तुटलेल्या स्थितीत केलेल्या फलंदाजीचं कौतुक आजही केलं जातं.
युवराज सिंह - फलंदाजी करत असताना रक्ताची उलटी झाल्यानंतरही 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका युवराज सिंहने बजावली होती. वर्ल्ड कपच्या अखेरच्या लीग मॅचवेळी चेन्नईत गरम वातावरणात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना गंभीर 8 व्या षटकात बाद झाला. तेव्हा भारताची धावसंख्या 2 बाद 51 अशी होती. त्यानंतर युवराज आणि विराट यांनी चौथ्या गड्यासाठी 100 हून अधिक धावांची भागिदारी केली होती. यावेळी युवराज सिंहला रक्ताची उलटी झाली होती. तेव्हा युवराज सिंह फुफ्फुसात वाढणाऱ्या कॅन्सरच्या ट्युमरशी झुंज देत होता.
महेंद्र सिंह धोनी - 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या बोटाला हेअरलाइन फ्रॅक्चर झालं होतं. दुखापतीनंतरही धोनी पूर्ण वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. मैदानावर धोनी अंगठ्याचं रक्त चोखल्यानंतर मैदानावर थुंकताना फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर धोनीचे फोटो समोर आले होते. हाताला वेदना होत असतानाही धोनीने तेव्हा फलंदाजी केली होती.
ग्रॅमी स्मिथ - ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2009 मध्ये सिडनी कसोटीत मिशेल जॉन्सनचा एक वेगवान चेंडू स्मिथला लागला होता. त्यात त्याचा डावा हात तुटला होता. 30 धावांवर फलंदाजी करणाऱ्या स्मिथला रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर प्रोटियाजला 327 धावांवर बाद केलं, त्यानतंर दुसऱ्या डावात 257 धावा करून ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 367 धावांचे आव्हान दिले होते. दक्षिण आफ्रिकेच्या 9 विकेट पडल्या होत्या आणि त्यांना 100 हून अधिक धावा करायच्या होत्या. सामना संपल्याचं सर्वांना वाटलं पण तेव्हा स्मिथ दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता.
हनुमा विहारी - भारताचा फलंदाज हनुमा विहारी हा सीडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या प्रसिद्ध अशा ड्रॉसाठी जबाबदार होता. चौथ्या डावात फलंदाजी करताना त्याचा डावा पाय चेतनाहीन झाला होता. तेव्हा भारताला विजयासाठी 407 धावांची गरज होती आणि संघाच्या 4 बाद 250 धावा झाल्या होत्या. विहारीने फलंदाजी करताना अश्विनसोबत नाबाद 62 धावांची भागिदारी केली होती आणि सामना अनिर्णित राखला होता. पेनकिलर आणि इंजेक्शन घेऊन हनुमा विहारीने अडीच वाजता मॅरेथॉन खेळी केली होती. त्याने तब्बल 161 चेंडू खेळून काढले होते.
सचिन तेंडुलकर : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाही दुखापतींचा अनेकदा सामना करावा लागला. 2003 च्या वर्ल्ड कपवेळी सचिन तेंडुलकरला डायरिया झाला होता. तरीही तो श्रीलंकेविरुद्ध सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. सचिनने त्या सामन्यात 97 धावांची खेळी केली होती आणि भारताने 183 धावांनी सामना जिंकला होता.