यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा नांदेडच्या शिवराज राक्षेने पटकावली. त्याने अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा पराभव केला. दरम्यान, या लढतीआधी महेंद्र आणि सिकंदर शेख यांच्यात झालेल्या कुस्तीची चर्चा जोरदार होत आहे. यात महेंद्र गायकवाडला दिलेल्या गुणांवरून पंचांसह आयोजकांवर आरोप केले जात आहेत.
सिकंदर शेखला महेंद्र गायकवाडकडून गुणांच्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्याआधी सिकंदर शेखने उपांत्य सामन्यात माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिकला चीतपट करून माती विभागातून फायनलमध्ये प्रवेश केला होता.
सिकंदर शेखला महेंद्र गायकवाडकडून गुणांच्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्याआधी सिकंदर शेखने उपांत्य सामन्यात माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिकला चीतपट करून माती विभागातून फायनलमध्ये प्रवेश केला होता.
पुढच्या फेरीत महेंद्र गायकावडने ४ गुण मिळवले आणि ५-४ अशी आघाडी घेतली. मात्र यामध्ये महेंद्र गायकवाडने सिकंदरला बाहेरील टांग हा डाव टाकला. तो परफेक्ट नव्हता असं काहींचे म्हणणे असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. सिकंदर धोकादायक पोजिशनला नव्हता तरी महेंद्रला चार गुण कसे दिले गेले? असा प्रश्न विचारला जातोय.
महेंद्रने टांग मारली तेव्हा सिकंदर पाठीवर पडला का? किंवा त्याचा खांदा मैदानावर टेकला का? यासारखे प्रश्न कुस्ती शौकिन विचारत आहेत. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी जिंकला असला तरी सिकंदरच खरा महाराष्ट्र केसरी आहे अशा भावना कुस्तीप्रेमी व्यक्त करतायत. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळचा असलेल्या सिकंदरला त्याच्या आजोबांपासूनच कुस्तीचा वारसा मिळाला होता. वडीलांना गरिबीमुळे कुस्ती सोडून हमालीचं काम करावं लागलं होतं.
सिकंदर लष्करातही भरती झाला आणि सैन्य दलाकडून खेळत त्याने अनेक मैदानं जिंकली आहेत. मुलगा मोठा मल्ल व्हावा हे वडिलांचं स्वप्नही त्यानं पूर्ण केलंय. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकता आली नसली तरी राज्यातील कुस्तीशौकिनांचे मन सिकंदरने जिंकलंय.
सिकंदरने आतापर्यंत अनेक कुस्त्या जिंकून बक्षीसांची लयलूट केलीय. यात एक महिंद्रा थार, जॉन डिअर ट्रॅक्टर, चार आल्टो कार, २४ बुलेट, ६ टीव्हीएस, ६ स्प्लेंडर दुचाकी तर तब्बल ४० चांदीच्या गदा सिकंदरने पटकावल्या आहेत.