भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी पुन्हा संघात समावेश करण्यात आला आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत पहिल्या दोन्ही कसोटी संघात त्याचा समावेश होता. मात्र बंगालविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी त्याला रिलीज करण्यात आलं होतं.
जयदेव उनादकटचा वनडे संघातही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी जयदेवच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी जिंकली. सौराष्ट्रने फायनलमध्ये बंगालला हरवून दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं.
जयदेव उनादकटने अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्याच वर्षी जुलै महिन्यात झिम्बॉब्वेविरुद्ध त्याने पदार्पण केलं होतं. जयदेव उनादकटने आतापर्यंत ७ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत.
भारतीय संघातून वगळल्यानंतरही जयदेवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये घाम गाळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानतंर निवड समितीने त्याला आता पुन्हा संधी दिली आहे.
जयदेवला याआधी बांगलादेश दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी निवडलं होतं. तेव्हा १२ वर्षांनी कसोटी संघात तो खेळला होता. त्याने २ कसोटीत ३ विकेट घेतल्या आहेत.
रणजी ट्रॉफीत फायनल सामन्यात जयदेव उनादकटने बंगालविरुद्ध ९ विकेट घेतल्या. विजय हजारे ट्रफीच्या यंदाच्या हंगामात त्याने १० सामन्यात १९ विकेट घेतल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला होता. यातही त्याने सौराष्ट्रला विजेतेपद मिळवून दिले आहे.