हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सने आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा दुसराच हंगाम आहे. गुजरातने गेल्या वर्षी अंतिम सामन्यात राजस्थानला नमवून विजेतेपद पटकावलं होतं. आता क्वालिफायर दोन सामन्यात मुंबईला हरवले असून फायनलमध्ये चेन्नईविरुद्ध सामना होणार आहे.
आयपीएल २०२३मध्ये १० संघ उतरले असून टी२० च्या इतिहासात आजपर्यंत १५ संघ सहभागी झाले आहेत. याशिवाय ६४ खेळाडूंनी किमान एका सामन्यात तरी कर्णधारपद भूषवलं आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याकडे रविवारी मोठी संधी असणार आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने आयपीएल जिंकल्यास कर्णधार म्हणून पदार्पण करताना सलग दोन विजेतेपद पटकावण्याचा विक्रम होणार आहे.
गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले तर ते १४ संघांना मागे टाकतील. १४ संघांना पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत एकदाही सलग दोन वेळा विजेतेपद पटकावता आलेलं नाही. पदार्पणात २००८ मध्ये शेन वॉर्नने राजस्थानला विजेतेपद पटकावून दिलं होतं. त्याशिवाय रोहित शर्मा २०१३ मध्ये पहिल्यांदा कर्णधार झाला होता आणि मुंबई विजेते झाले होते. पण पदार्पणात सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याची कामगिरी त्यांना करता आली नव्हती.
हार्दिक पांड्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३० सामन्यात नेतृत्व केलं. यापैकी २२ सामन्यात विजय तर ८ सामन्यात पराभव झाला आहे. आयपीएल २०२३ मध्ये लीग फेरीत १४ पैकी १० सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. क्वालिफायर १ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत व्हावं लागलं. आता फायनलमध्ये पुन्हा धोनीच्या संघाशी गाठ पडणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन संघांनाच सलग दोनदा विजेतेपद पटकावता आलं आहे.चेन्नईने 2010 आणि 2011 मध्ये तर मुंबई इंडियन्सने 2019 आणि 2020 मध्ये ही कामगिरी केली होती.