12 जुलैपासून टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पहिले टेस्ट मॅच खेळणार आहे, त्यासाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. टेस्ट टीममधून चेतेश्वर पुजाराला डच्चू देण्यात आला असून ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार यांना संधी देण्यात आली आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया तीन टेस्ट आणि तीन वनडे मॅच खेळणार आहे, यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये बिहारचे दोन खेळाडू ईशान किशन आणि मुकेश कुमार यांना संधी मिळाली आहे. मुकेश कुमार बिहारच्या गोपालगंजचा रहिवासी आहे.
मुकेश गोपालगंजच्या काकडकुंड गावामध्ये राहतो. मुकेश कुमारची टीम इंडियात निवड झाल्यामुळे आसपासच्या भागामध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं मुकेशचा मित्र आणि जिल्हा टीमचा माजी कर्णधार अमित कुमारने सांगितलं.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाल्यानंतर मुकेशची आई मालती देवी, काका यांच्यासह पूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आहेत. मुकेशची आई मालती देवी टीममध्ये निवड झाल्यानंतर मुकेशसोबत फोनवर बोलल्या.
मुकेशचे काका कृष्णा सिंह यांनी मुकेशच्या भारतीय टीममधल्या निवडीचा संघर्षही सांगितला आहे. 'घराची जबाबदारी माझ्यावरच होती, बाकी जण बाहेर कमावण्यासाठी गेले होते. सुरूवातीला मी मुकेशच्या क्रिकेट खेळण्याच्या विरोधात होतो, यासाठी मी त्याला वारंवार मनाई करायचो. खेळल्यामुळे भांडणं होतील, असं मला वाटायचं. लोकांच्या तक्रारी आणि बदनामीची भीती होती, पण तो ऐकला नाही. मुकेशच्या चांगल्या खेळाबद्दल लोक अभिनंदन करायचे, तेव्हा तो काहीतरी चांगलं करतोय, याची जाणीव झाली,' असं मुकेशचे काका कृष्णा सिंह म्हणाले.
मुकेशला खेळायला मनाई केल्यानंतरही तो चोरून क्रिकेट खेळायचा. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यामुळे शिकून नोकरी करण्यासाठी कायमच त्याच्यावर दबाव होता, पण आज त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे.
मुकेश कुमारची टीम इंडियात निवड झाल्यानंतर गोपालगंजचे जिल्हाधिकारी नवल किशोर चौधरी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. मुकेशने फक्त गोपालगंजच नाही तर पूर्ण बिहारचा गौरव केला आहे, असं ते म्हणाले.