अंबाती रायडूने आयपीएल २०२३ विजेतेपद जिंकण्याआधीच निवृत्तीची घोषणा केली होती. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या रायडूने संघाला विजेतेपद मिळाल्यानंतर निवृत्ती घेतली. फायनलमध्ये सीएसकेने गुजरात टायटन्सला हरवलं. मात्र धोनीचा सहकारी खेळाडू रायुडूला करिअरमध्ये खूप संघर्ष करावा लागला.
अंबाती रायुडूने काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर शिवलाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. रायुडूने म्हटलं होतं की, अध्यक्षाने त्यांचा मुलगा अर्जुन यादवचं करिअर करण्यासाठी मला त्रास दिला. त्यामुळे मला हैदराबादला जावं लागलं.
अर्जुन यादव एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही. त्याने देशांतर्गत अखेरचा सामना नोव्हेंबर २०१२ मध्ये खेळला होता. तर दुसरीकडे अंबाती रायुडूने भारताकडून ५५ एकदिवसीय सामने आणि ६ टी२० सामने खेळले. अधिकाऱ्यांनी त्रास दिल्यानंतरही अंबाती रायुडू भारतीय संघात जागा मिळवू शकला.
अर्जुन यादवने हैदराबादकडून ८३ प्रथम श्रेणीचे सामने खेळले. २८ च्या सरासरीने ३७०३ धावा केल्या. यात ५ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश होता. १५५ ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती. तर लिस्ट ए मध्ये त्याने ६९ सामन्यात १३९३ धावा केल्या. यात ९९ ही सर्वोच्च धावसंख्या होती.
आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्समध्येही अर्जुन यादव होता. टी२० मध्ये त्याने १९ सामने खेळले. यात फक्त १९८ धावात त्याला करता आल्या. अर्जुन २००० मध्ये पहिलंयादा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघात होता. त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तेव्हा मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली भारत जिंकला होता, तर युवराज सिंग हा प्लेअर ऑफ सिरीज ठरला होता.
अंबाती रायुडूने ५५ एकदिवसीय सामन्यात १६९४ धावा केल्या. यात ३ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. तर ६ टी२० सामन्यात ४२ धावाच करता आल्या. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्यानं त्याने थेट निवड समितीशी पंगा घेतला होता.
अंबाती रायुडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९७ सामन्यात ६१५१ धावा केल्या. यात १६ शतके आणि ३४ अर्धशतके केली आहेत. २१० धावांची सर्वोच्च खेळीही साकारली आहे.
चेन्नई आणि मुंबई इंडियन्सकडून आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या अंबाती रायुडूने एकूण २९१ टी२० सामन्यात २७० डावात ६ हजार २८ धावा केल्या आहेत. यात एका शतकासह ३१ अर्धशतके केली आहेत.