बिहारमध्ये अनेक प्रचलित देवस्थानं आहेत. त्यापैकीच सर्वात प्रसिद्ध पौराणिक घाट म्हणजे 'रामरेखा घाट'. ताडका राक्षसाच्या वधानंतर स्वतः प्रभू श्रीरामांनी धनुष्य बाणाच्या कोनाने एक रेखा आखली होती. त्यावरूनच या ठिकाणाला रामरेखा घाट असं नाव पडलं. या रेषेमुळेच सिद्धाश्रम धामात कोणत्याही वाईट शक्तीचा प्रवेश होऊ शकत नाही, अशी मान्यता आहे. या घाटाजवळच विश्वमित्र आश्रम आणि रामेश्वर नाथ मंदिर आहे. असं म्हणतात की, या मंदिरात स्वतः श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे या मंदिरावर भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे.
बक्सरच्या चरित्रवनात मुक्तिधाम नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्मशानघाटात दिवस-रात्री मृतदेहांच्या तिरड्या येतात. वाहत्या उत्तरायणी गंगेमुळे येथे दररोज 20-25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यांसह इतर अनेक जिल्ह्यांतूनही लोक मृतदेहाच्या अंत्यसंस्कारांसाठी येथे येतात. या स्मशानघाटात प्रसिद्ध कालभैरव आणि माता तारेचं मंदिरही आहे.
बक्सर शहराच्या मध्यभागी उभा असलेला हा घाट अतिशय प्राचीन आहे. असं म्हटलं जातं की, फार वर्षांपूर्वी या घाटाजवळ एक संत राहायचे. त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक आशीर्वाद सत्यात उतरायचा. त्यांची सिद्धी पाहून लोक त्यांना सिद्धबाबांच्या नावाने ओळखू लागले. त्यावरूनच या घाटाला 'सिध्दनाथ' असं नाव पडलं. तर, याठिकाणी सिद्धबाबांनी स्थापन केलेल्या मंदिराला 'सिद्धेश्वर नाथ मंदिर' असं नाव देण्यात आलं. याठिकाणी आजही दररोज शिवलिंगाची पूजा केली जाते.
या घाटाची योग्य देखभाल केली जात नसल्याने तो फारसा पाहण्यायोग्य नाही. मात्र या घाटाच्या मधोमध एक प्राचीन आणि विशाल विहीर आहे. प्राचीन काळी राजा रुद्रदेवाच्या गडाची राणी बोगद्याने या विहिरीवर येत असे, असं म्हटलं जातं. राणी इथे येऊन स्नान करायची. त्यामुळेच या विहिरीला 'राणी विहीर' आणि घाटाला 'राणी घाट' असं नाव देण्यात आलं.
बक्सरमधील नाथ मंदिराजवळ असलेला हा घाट अतिशय सुंदर आहे. या घाटाचं महत्त्व असं की, येथे दररोज शेकडो भाविक स्नान करण्यासाठी येतात. आदिनाथ आखाड्यातील साधू-संतही या घाटावर स्नान करतात, त्यामुळेच या घाटाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.