हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. घरातील सुख, समृद्धी, धनसंपत्ती, भांडण, आजारपण या सगळ्याचा संबंध वास्तूशी असतो. घराचं गोकुळ कसं करावं, याबाबत वास्तूशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. या नियमांनुसार, ईशान्य दिशेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधला भाग म्हणजे ईशान्य. 'ईशान्य' हे महादेवाचं दुसरं नाव. अर्थातच या दिशेत देवाचा वास असतो. त्यामुळे घराचा हा कोपरा दैवी मानला जातो. हा कोपरा जितका स्वच्छ, तितकं घर समृद्ध, अशी मान्यता आहे.
घरातील देवघर कायम ईशान्य कोपऱ्यात असावं. हा कोपरा नेहमी स्वच्छ असावा. तरच तिथे लक्ष्मीचा वास निर्माण होतो. वास्तू सल्लागार वेदमूर्ती कुलदीप जोशी यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.
वास्तूशास्त्रानुसार, घरातील ईशान्य कोपऱ्यात कोणतीही जड वस्तू ठेवू नये. कारण जड वस्तूमुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार थांबतो. तसेच या भागात कधीही चप्पल ठेवू नये किंवा कचरा गोळा करू नये. असं केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा संचारते. त्याचबरोबर नवविवाहित दाम्पत्याची खोली या भागात मुळीच नसावी. त्यामुळे परस्पर संबंधांमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि अनावश्यक समस्या वाढतात.
वास्तूशास्त्रात पिण्याचं पाणी ठेवण्यासाठी ईशान्य दिशा उत्तम मानली गेली आहे. तुम्ही नवीन घर बांधत असाल तर घराच्या या कोपऱ्यात जलस्रोत बनवा किंवा जमिनीखाली पाण्याची टाकी बसवा. ईशान्य भागात विहीर खोदणं अत्यंत शुभ मानलं जातं. या विहिरीमुळे घरात ऐश्वर्य नांदतं.