उत्तर प्रदेशातील ज्योती मौर्यासारखीच मुजफ्फरपूरमध्येही एक ज्योती निघाली. पतीने कठीण परिस्थितीतही शिकवलं, नोकरी करायला दिली. आता ज्योतीने पती, मुलांना सोडून प्रियकरासोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. तर तिचा पती आणि दहा वर्षांचा मुलगा न्यायासाठी भटकत आहेत.
मुजफ्फरपूरमधील सुभाषनगरमध्ये राहणाऱ्या प्रियरंजनचे तिथेच राहणाऱ्या ज्योतीवर प्रेम जडले. त्यानतंर २००९ मध्ये घरातून पळून जात दोघांना गुरुग्राममध्ये लग्न केलं. दोघांनी खासगी नोकरीही सुरू केली. ज्योतीने चांगलं शिक्षण घेतल्यानंतर प्रियरंजनने तिला स्पर्धा परीक्षेच्या क्लासला घातलं.
परीक्षेच्या तयारीसाठी ज्योती आणि प्रियरंजन हे पटनामध्ये रहायला लागले. यावेळी ज्योतीची ओळख सोमेश्वरशी झाली आणि दोघे सोबत राहू लागले. पत्नीला नोकरी मिळावी यासाठी प्रियरंजनने आपली जमीन विकली, मित्रांकडून ४० लाख कर्ज घेऊन सेंटर मॅनेज केलं असंही म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर तिचा मित्र सोमेश्वरलासुद्धा पैसे दिले. पण जेव्हा पत्नीला नोकरी लागली तेव्हा ती पतीला विसरली.
2019 मध्ये ज्योती पोलीस कॉन्स्टेबल बनली पण आता ज्योतीवर आरोप आहे जेव्हापासून ती पोलीस कॉन्स्टेबल झाली तेव्हापासून तिच्याच एका बॅचमेटसोबत तिला रहायचं आहे. या प्रकरणी पतीने SDOच्या न्यायालयातही केस दाखल केली आहे.
ज्योतीने उलट पतीलाच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ज्या पत्नीला पतीने पोलीस होण्यास मदत केली. आता ती तिच्या पोलिसी बळाचा वापर पतीविरोधात करत आहे.
प्रियरंजनने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तर उत्तर प्रदेशातील एसडीएम ज्योती मौर्यासारखीच ही बिहारची ज्योती कुमारी असल्याचं म्हटलं जात आहे.