लग्न समारंभ म्हटलं की अनेकदा तो भव्य करण्यासाठी मोठा खर्च केला जातो. पण बाडमेर इथं एका कुटुंबाने २१ जोडप्यांचा एकाच वेळी विवाह केला.
लग्न समारंभासाठी शेकडो लोक आले होते. यावेळी त्यांनी नवदाम्पत्यांना शुभाशिर्वाद तर दिलेतच सोबत कुटुंबाच्या कृतीचे कौतुकही केले.
बाडमेर जिल्ह्यातल्या देरासर इथं हाजी शौबत अलीसर कुटुंबाने अनावश्यक खर्च टाळण्यासाठी कुटुंबातील लग्नाच्या वयाच्या तरुण तरुणींचे एकत्रच लग्न लावून देत अनोखा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
एकाच मंडपात २१ नवरदेव आणि २१ वधुंचा विवाह सोहळा झाला. जिलानी जमातच्या सदर हाजी इदरीश यांनी एक नवं पाऊल टाकत कुटुंबातील लोकांना विनंती केली की आपल्याला अनावश्यक खर्च थांबवला पाहिजे. यातून जे पैसे वाचतील त्यातून समाजाच्या शिक्षणावर खर्च करावा असा प्रस्ताव त्यांनी मांडला.
एकाच कुटुंबातील २१ जणांचे लग्न एका वेळी करून वेळेची आणि खर्चाची बचत करण्याचा संदेश त्यांनी दिला. या समारंबात मुस्लीम धर्मगुरू पीर सय्यद नुरुल्ला बुखारी, अल्पसंख्यांक मंत्री सालेह मोहम्मद हेसुद्धा सहभागी झाले होते.