अरबी समुद्रात दोन वर्षांपूर्वी मे 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळात जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला होता. यात बहुतांश नागरिक गुजरातचे होते. तर अनेकजण बेपत्ता झाले होते. चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग 210 किमी प्रतितास इतका होता.
2019मध्ये ओडिशात फनी चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. यात 100 नागरिक मृत्यूमुखी पडले होते. गेल्या पाच वर्षात सर्वाधिक विध्वंस करणारं हे चक्रीवादळ होतं. ओडिशाच्या पूर्व भागाला याचा मोठा तडाखा बसला होता. चक्रीवादळ येण्याआधी लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठी जिवीतहानी टळली होती.
ऑक्टोबर 2013 मध्ये ओडिशात फेलिन चक्रीवादळाने थैमान घातलं होतं. यात 46 जणांचा मृत्यू झाला होता. तर 260 बिलियन रुपयांचे नुकसान झाले होते. देशातील 12.23 मिलियन लोकांना याचा फटका बसला होता. ओडिशा, आंध्र प्रदेश, अंदमान निकोबारसह अनेक राज्यात याचा परिणाम झाला होता.
ओडिशात ऑक्टोबर 1999 मध्ये सुपर चक्रीवादळाने मृत्यूचं तांडंव केलं होतं. 260 किमी प्रतितास वेगाने हे चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीला धडकलं होतं. यात जवळपास 9 हजार 887 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 हजार 142 जखमी झाले होते.
25 वर्षांपूर्वी गुजरातला मे 1998 मध्ये प्रचंड अशा चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. गेल्या २५ वर्षातलं हे सर्वात मोठं चक्रीवादळ आहे. यामुळे १० हजार जणांचा मृत्यू झाला होता. गुजरातच्या अर्थव्यवस्थेलाही यामुळे मोठा फटका बसला होता.