अनेक वेळा आपण बाजारात काही तरी खरेदी करायला जातो. यावेळी आपण दुकानदाराला 500 ची नोट देतो. मात्र तो सुट्टे पैसे आणा अशी मागणी करतो. कारण परत देण्यासाठी त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसतात. बाजारात सध्या सुट्ट्या पैशांची कमतरता आहे. याचाच विचार करुन रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
बँकेकडून ही समस्या दूर केली जाणार आहे. सीएनबीसीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एटीएममध्ये आता छोट्या नोटांची संध्या वाढवण्यावर विचार केला जात आहे.
सुट्टे पैसे म्हणजेच छोट्या नोटा उपलब्ध होत नसल्याची तक्रार रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचली आहे. यानंतर सरकार पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक एटीएममध्ये छोट्या नोटांची संख्या वाढवण्यावरच विचार करत नाही, तर त्याशिवाय विविध पर्यायांचाही विचार केला जाणार आहे. एटीएममध्ये छोट्या नोटांची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली जाऊ शकतात.
नवीन एटीएम सुरू करण्याबाबत विचार सरकार UPI वर आधारित एटीएम बसवण्याचाही विचार करू शकते. या UPI आधारित ATM मधून सामान्य लोक छोट्या नोटा काढू शकतील. या तक्रारींनंतर रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली.
सुट्या पैशांच्या समस्येवर रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची या महिन्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अनेक सूचना करण्यात आल्या. यामध्ये यूपीआय एटीएमपासून अधिक लहान नोटा बाजारात आणण्यासाठी पावले उचलण्यात आली. आता आगामी काळात कोणती नवी पावले उचलली जातात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.