"एक अनार,दो बिमार'ही म्हण आपल्या सर्वांनाच माहित आहे,पण एक शर्यत पार पडल्यानंतर बक्षीसाच्या वाटपावरून असाच काहीसा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे, देशातील सगळ्यात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यती मध्ये बकासुर आणि महिब्या बैलजोडीने मैदान मारत थार गाडी जिंकली.
पण यानंतर ठार गाडी कोण घेणार यावरून तिढा निर्माण झाला आणि अखेर आयोजक असणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी थेट दोन्ही मालकांना प्रत्येकी एक-एक थार गाडी देऊन टाकली आहे.
देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती सांगलीच्या भाळवणी मध्ये पार पडल्या आणि या बैलगाडी शर्यतीमध्ये थार गाडीसाठी बकासुर आणि महिब्या ही बैल जोडी पळाली आणि दोघांनीही थार गाडी आपल्या पदरात पाडली.
दोन्ही बैलांची मालक वेगवेगळे त्यामुळे थार गाडी कोणाला मिळणार ? किंवा कोण घ्यायची ? हा प्रश्न आणि तिढा निर्माण झाला होता. शर्यत होऊन सहा दिवस उलटून देखील थार गाडीचं वाटप होऊ न शकल्याने अखेर बैलगाडी शर्यतीचे आयोजक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी दोन्ही बैल मालकांना बोलवून चर्चा केली.
चार तास थार गाडी कोणाला द्यायची याबाबत चर्चा सुरू होती,मात्र कोण गाडी मिळणार यावर एकमत होत नव्हतं,यामुळे चंद्रहार पाटलांनी मग बकासुरच्या मालकाला थार गाडी द्यायचं निर्णय घेतला,पण महिब्या बैल मालक असणाऱ्या सदाशिव मास्तरने आपण आपल्या बैलाला काय उत्तर द्यायचं ? हा सवाल केला.
या भावनिक प्रश्नावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील चितपट झाले, मग चंद्रहार पाटलांनी गोवंश संवर्धन डोळ्यासमोर ठेवत दोन्ही बैलांना एक-एक थार देण्याचा निर्णय जाहीर केला,आणि सांगलीमध्ये बकासुर आणि महिब्याच्या मालकांना थार गाडी बुकिंगच्या पावत्या प्रदान केल्या.
थार गाडी कोणाला मिळणार हा निर्माण झालेला तिढा तर सुटलाच, शिवाय प्रत्येक बैलाला एक- एक थार गाडी बक्षीस देखील मिळाले आहे.