ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ओडिशातील बालासोर येथे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आणि विरुद्ध रुळावर पडले. त्यामुळे यशवंतपूरहून हावडाकडे जाणाऱ्या आणखी एका रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला. आज आपण देशातील अशाच सात भीषण रेल्वे अपघातांची माहिती जाणून घेणार आहोत.
खगडिया अपघात : या अपघाताचा समावेश हा जगातील पहिल्या पाच भीषण अपघातामध्ये होतो. 6 जून 1981 ला हा अपघात झाला होता. मानसी वरून ही पॅसेंजर ट्रेन सहरसाकडे चालली होती. मात्र ट्रेन बागमती रेल्वेच्या पुलावर आल्यानंतर या ट्रेनचे डबे रेल्वे रुळावरून घसरले. या रेल्वेचे सात डबे हे थेट नदीत कोसळले होते. या अपघातामध्ये तीनशे लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, मात्र या अपघातामध्ये कमीत कमी 800 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो.
3 ऑगस्ट 1999 ला पश्चिम बंगालच्या गॅसलमध्ये मोठा ट्रेन अपघात झाला होता. दिल्लीला निघालेली ब्रह्मपूत्र मेल आणि औंध -आसाम एक्स्प्रेसमध्ये समोरासमोर धडक झाली होती. या अपघातामध्ये 285 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 312 लोक जखमी झाले.
26 नोव्हेंबर 1998 ला पंजाबच्या खन्ना जिल्ह्यात दोन ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. जम्मू तवी-सियालदह एक्स्प्रेस आणि अमृतसर गोल्डन टेंपल एक्स्प्रेसची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातामध्ये कमीतत कमी 209 लोकांचा मृत्यू झाला होता तर 120 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
28 मे 2010 रोजी पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रेल्वे रूळावरून घसरली होती. या अपघातामध्ये 170 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
10 संप्टेबर 2002 ला बिहारच्या गयामध्ये मोठा रेल्वे अपघात घडला होता. भरधाव जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचे काही डबे रेल्वे रुळावरून घसरून थेट नदीत पडले. या अपघातामध्ये जवळपास 150 लोकांचा मृत्यू झाला होता.
21 नोव्हेंबर 2016 ला उत्तर प्रदेशातील कानपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर पटना -इंदोर एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला होता. ट्रेनचे 14 डबे रेल्वे रुळावरून घसरले होते. या अपघातामध्ये 142 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये 200 पेक्षा अधिक लोक जखमी झाले.
14 सप्टेंबर 1997 ला मध्यप्रदेशच्या बिलासपूरमध्ये अहमदाबाद -हावडा एक्स्प्रेसचा भीषण अपघात घडला होता. ट्रेनचे पाच डबे नदीत कोसळले होते. या अपघातामध्ये 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर दोनशे पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.