बीडमध्ये पाच दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सव सुरू आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेला कृषी महोत्सव 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
या कृषी महोत्सवामध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
यातील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे एक स्टॉल लावण्यात आला आहे. सकस आहारांविषयीचा तिरंगा थाळीचा स्टॉल लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आर्थिक विकास मंडळातर्फे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक महिलांमध्ये ॲनेमिया असल्याचे आढळले.
सकस आहाराच्या अभावाने महिलांमध्ये अशक्तपणा जाणवतो. त्यासाठी महिलांनी आहारात कडधान्ये आणि फळांचे सेवन करावे हे तिरंगा थाळीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
या थाळीमध्ये मटकी, गावरान चने, नाचणीचा पापड, दूध, दही, फ्रुट सलाड, बाजरी भाकरी, ज्वारीची भाकरी, काजू, बदाम, गाजराचा हलवा, शेंगदाण्याचे लाडू यासारखे पदार्थ आहेत.
तसेच तिरंगा थाळीत द्राक्षांसह विविध फळे आहेत. शरीराला पोषक व अधिक विटामिन सत्त्व असणारी कडधान्ये, खाद्यपदार्थ या तिरंगा थाळीमध्ये आहेत.
पोषक आणि सात्विक पदार्थ थाळीत ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ही तिरंगा थाळी दिसायलाही आकर्षक वाटत आहे.