मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठकने त्याच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांवर पाडली आहे. या अभिनेत्याने अतिशय कष्टातून चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
संदीप पाठक प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यात त्याने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
संदीपने वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पहिला आहे. याविषयीचा अनुभव सांगत त्याने दुष्काळी भागातील भीषण परिस्थिती सांगितली.
संदीप पाठक मूळचा मराठवाड्यातील बीड मधील माजलगाव या गावचा आहे. हा भाग मुख्यतः दुष्काळी भाग आहे. तिथे जास्त पाऊस पडत नाही. त्यामुळे 21 व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पाहिल्यानंतर त्याचं अफाट पाणी पाहून संदीप भांबावून गेला.
याविषयी बोलताना तो म्हणाला, 'मी बीडचा, आमच्याकडे सतत दुष्काळ असतो. त्यामुळे समुद्राचं एवढं पाणी पाहून मी चकितच झालो.'
तो पुढे म्हणाला, 'आमच्याकडे घरात थेंबभर पाणी कुठे वाया जात असेल तर माझ्या आईचं ब्लडप्रेशर वाढतं. कुठे पाईपलाईन फुटली आणि हजरो लिटर पाणी वाया गेलं तर ते ऐकून सुद्धा आम्हाला दुःख होतं.'
संदीप पाठक बीडच्या दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना पुढे म्हणाला, 'आमच्या मराठवाड्यातील लोकांच्या डोळ्यात पटकन पाणी येतं पण नळाला लवकर येत नाही.' त्याने केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
संदीप सोशल मीडियावरील अनेक ट्रेंड फॉलो करत असतो. रिल्स व्हिडीओ शेअर करत असतो. इतकंच नाही तर एखाद्या विषयावर त्याचं मत देखील तो स्पष्टपणे मांडत असतो.
नुकतंच तो 'आपडी थापडी' या चित्रपटात दिसला होता. या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.