शिव ठाकरे आज घराघरात लोकप्रिय आहे. पण त्याला खरी ओळख बिग बॉस मराठीच्या घरात मिळाली. या घरात त्याचं आणि मराठी अभिनेत्री वीणा जगतापचं नातं खूप गाजलं.
पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. आज दोघेही वेगळे झाले असले तरी कायम एकमेकांना पाठींबा देताना दिसतात. नुकतंच शिवने विनविषयी केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे.
नुकतंच लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत शिव ठाकरेने मौन सोडलं आहे. यावेळी बोलताना शिव म्हणाला, 'उगाच कोणत्याही गोष्टी होत नाहीत. तुम्ही भूतकाळात काही गोष्टी केलेल्या असतात. तुमच्यासाठी तो बॉण्ड, ते रिलेशन खूप महत्त्वाचं असतं.'
तो पुढे म्हणाला की, 'नातं संपल्यानंतरही समोरच्याला इजा न होऊ देता तुम्ही ते कसं जपता हे महत्त्वाचं आहे, कारण तो बाँड आणि नातं तुमचं होतं, तुमच्या कुटुंबाचं नाही.'
वीणा बद्दल बोलताना पुढे शिव म्हणाला की, 'आमच्या दोघांतील काही गोष्टी फक्त आम्हालाच माहित असतात. मी या क्षेत्रात काम करतो त्यामुळे नातं संपल्यावर काय होईल याची मला कल्पना होतीच. मी त्याच पद्धतीने त्या गोष्टी हाताळल्या.'
शिव पुढे म्हणाला की, ' मी तेवढा स्ट्राँग आहे की माझ्या नात्यासाठी उभा राहील. ते नातं कसं जपायचं हे मला माहीत आहे, कारण मी तो आतापर्यंत जपत आलोय. समोरची व्यक्ती माझ्या सोबत असूदे नसूदे मला तिच्या डोळ्यात अश्रू नकोय.'
'सोशल मीडियावरील लोकांना काही गोष्टी माहीत नाहीत. पण मी त्यांना गप्प करण्यापेक्षा त्या व्यक्तीला सांभाळलं, दोन्ही कुटुंबाला सांभाळलं' अशा भावना शिवने व्यक्त केल्या आहेत.
हिंदी बिग बॉसच्या घरात असताना शिव आणि वीणाच्या नात्याची चर्चा झाली होती. वीणाने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत शिवला पाठींबा दिला होता. त्यामुळे या दोघांचं नातं पुन्हा पूर्ववत झालं की काय अशी चर्चा फॅन्समध्ये रंगली होती.