भुसावळ, 26 ऑगस्ट: भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विलास दिनकर चौधरी ( वय-38) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. विलास दिनकर चौधरी या तरुणावर चाकू हल्ला आणि गोळीबार झाला असून त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली.
हेही वाचा... 'आपला झंझावात आम्ही आजही पाहतोय', रोहित पवारांनी आजोबांबाबत व्यक्त केल्या भावना
मिळालेली माहिती अशी की, विलास चौधरी घराबाहेर फोनवर बोलत असताना काळे कपडे घालून आलेल्या तीन ते चार तरुणांनी त्याच्या हात आणि पोटावर चाकूनं सपासप वार केले. यावेळी विलास चौधरी घरात पळला. त्यानं घराचा दरवाजा आतून बंद केला. मात्र, या हल्लेखोरांनी पुन्हा घराकडे येऊन दरवाज्यावर दगडफेक करून घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला. हल्लेखोरांनी विलासवर गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली आणि ते पसार झाले.
डीवायएसपी गजानन राठोड आणि पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलं. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भुसावळ शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या वर्षाी भाजप नगरसेवकासह चौघांची हत्या करण्यात आली होती.
हेही वाचा... सुशांत केस ड्रग्स प्रकरण: भाजप आमदारानं उद्धव ठाकरे सरकारला केला खोचक सवाल
शहरातील आरपीडीरोडवरील लाल चर्चसमोर भाजपचे नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या खरात यांच्यासह त्यांची दोन मुले आणि मोठ्या भावावर पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला तसेच गोळीबार झाला होता. या घटनेत चौघे ठार झाले होते तर नगरसेवक खरात यांच्या पत्नी आणि दोन मुले व अन्य एक असे चौघे गंभीर जखमी झाले होते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरलं होतं. या घटनेत नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (वय 48), मुलगा प्रेमसागर रवींद्र खरात (वय 28) व गजरे नामक व्यक्ती हे चौघे जण ठार झाले होते.